तुळशी विवाह

तुळशी विवाह हा घरोघरी पार पडणारा एक पारंपरिक विवाहसोहळा आहे. यादिवशी विष्णू व तुळशीचा विवाह लावून दिला जातो. तुळशीला नवीन वस्त्र नेसवतात. त्यावर मांडव म्हणून ऊस, दिंडा काठी रोवतात. पूजेचे यथासांग उपचार करतात. त्यानंतर विष्णू व तुळस या दोघांमध्ये आंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणतात. त्यांचा विवाह लावला जातो. तुळशीचे कन्यादान करतात. मंत्रपुष्प आणि आरती करुन सर्वांना प्रसाद वाटतात. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा, असा त्यामागील हेतू आहे.
कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस हा सोहळा सुरू असतो. कार्तिक शुद्ध एकादशीलाच ‘प्रबोधिनी एकादशी’ म्हणतात. अशी श्रद्धा आहे की, यादिवशी चातुर्मास संपतो, म्हणजे श्रीविष्णू झोपेतून जागे होतात.
भगवान विष्णूला तुळस खूप प्रिय आहे. तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. घरातील-अंगणातील तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची, वृंदावनाची छान रंगरंगोटी करतात, तिला सजवितात. ते फार मनमोहक असते. त्यात चिंचा, आवळे ठेवतात. दुसऱ्या दिवशी ते पळविण्यासाठी मुलांची भारी झुंबड असते. या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धती आहे. गोवा, दीव आणि दमण येथे तुळशीविवाह सार्वजनिकरीत्या साजरा होतो. तुळशीची व बाळकृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक निघते. असा हा तुळशीविवाह सोहळा महाराष्ट्रात तर घरोघरी भक्तीभावाने पार पडतो.