घरच्या घरी भाजीपाला

शेती करण्यासाठी शेतजमीनच हवी, हे सत्य आहे ; परंतु अपार्टमेंटमध्ये राहणे किंवा अंगण नसणे हा भाजीपाला पिकवण्यात सर्वात मोठा अडथळा आहे असे वाटणे, ही चुकीची बाब आहे. अगदी लहान घरातही आपण भाजीपाला पिकवू शकतो. आपल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करू शकतो. आपण घरच्या घरी पालक, टोमॅटो, हिरवी मिरची, भेंडी, गाजर, हिरवे कांदे, कोथिंबीर किंवा पुदिना उगवू शकतो. यासाठी सर्वप्रथम, एक मोठे व खोल असे प्लास्टिकचे भांडे शोधावे. ज्यात आपल्या रोपांची मुळे वाढू शकेल असे ते असावे. पाणी काढून टाकण्यासाठी तळाशी या भांड्याला एक छिद्र असावे. यासाठी आपण जुन्या प्लास्टिकच्या बादल्या, बरण्या वापरू शकतो. छिद्र काढण्यासाठी गॅसवर चाकूचे टोक चांगले गरम करून घ्यावे. ते जेथे छिद्र हवे आहे, तेथे लावावे. आपल्याला हे भांडे डिश, बशी किंवा एखाद्या ट्रेवर ठेवावा लागेल; जेणेकरून रोपांच्या मुळाशी ओलावा कायम राहील.
आता या भांड्यात माती भरुन त्यावर बिया पेराव्यात, अथवा रोपे लावावीत. एकदा आपली रोपे तयार झाली की ती सूर्यप्रकाशात ठेवावी. घरामध्ये भाजीपाला वाढवण्याचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे प्रकाशाचा अभाव हे असते. म्हणूनच शक्य तितक्या जास्त वेळ सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी ठेवावीत. छत असेल तर उत्तम, पण नसेल तर बाल्कनी किंवा स्वयंपाकघराच्या खिडकीवर ठेवू शकता. खिडकीच्या प्रकाशाचा वापर करूनही लहान भाज्या सहज पिकवता येतात. यामध्ये धणे, मिरची आणि पालक यांचा सहज समावेश होतो. भाज्यांना दररोज किमान चार ते सहा तास सूर्यप्रकाश लागतो, तर फळांना दररोज आठ ते दहा तास सूर्यप्रकाश लागतो.
आता एका गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ते म्हणजे किती आणि केव्हा पाणी द्यावे ? जर माती ओलसर किंवा कोरडी असेल तर हंगामानुसार पाणी द्यावे. उन्हाळ्यात आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी नियमितपणे पाणी द्यावे लागेल; परंतु हिवाळ्यात हे आवश्यक नसते. एकतर स्प्रे बाटलीचा वापर करून त्यांना दररोज पाण्याचा फवारा द्या. काही झाडे मात्र कमी सूर्यप्रकाशातही चमत्कार करतात. धणे किंवा पालक कमी सूर्यप्रकाशातही वाढताना दिसतात. घरातील भाज्या वर्षभर पिकवता येतात. गाजरांना त्यांच्या आजूबाजूला जास्त जागा लागत नाही, परंतु त्यांना इतर भाज्यांपेक्षा खोल मातीची गरज असते. ते सुमारे 60 अंश फॅरेनहाइटवर वाढतात. त्यामुळे दिवसातील किमान 8 ते 12 तास भरपूर प्रकाश मिळेल याची खात्री करुन घ्या. हिरवा कांदा घरामध्ये चांगला वाढतो; कारण त्याची काळजी घेणे सोपे असते. आणि त्याला इतर भाज्यांप्रमाणे सूर्यप्रकाशाची गरज नसते. तुम्ही एकतर बिया वापरू शकता किंवा तुम्ही हिरव्या कांद्याच्या मुळाच्या टोकाची पुनर्लावणी करू शकता.
मिरचीची झाडे बारमाही असतात. ती उबदार हवामानात आणि पूर्ण सूर्यप्रकाशात वाढतात. परंतु ते स्व-परागकण करीत असल्यामुळे घरामध्येही चांगली वाढू शकतात. त्यांना प्रकाशाची आवश्यकता असते. ही रोपे किमान आठ इंच उंच असलेल्या कंटेनरमध्ये असावीत. टोमॅटो ही उष्ण हवामानातील वनस्पती आहे. म्हणून त्यांना दिवसाचे 14 ते 20 तास भरपूर प्रकाशाची आवश्यकता असते. त्याच्या लहान जाती कंटेनरमध्ये चांगल्या प्रकारे वाढतात.अशा काही भाज्या आहेत ज्या बियांशिवाय, भाजीपाला कापून पिकवू शकता. आले हा असाच एक प्रकार आहे. अशा प्रकारे आपण घरच्या घरी भाजीपाला तयार करू शकता.