गंगा नदीतील तणांनी रोजगार दिला

गंगा नदीत आढळणाऱ्या जलीय तणांचा वापर करुन अनेक महिलांनी आपले रोजगाराचे साधन मिळविले आहे. हजारो महिला या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय करु लागल्या आहेत. सामान्यतः भारतातील पाणवठ्यांमध्ये हे तण आढळतात. त्यांच्यावर प्रक्रिया करुन अनेक आकर्षक वस्तू बनविल्या जातात. या तणांपासून लाँड्री बास्केट, बास्केट, प्लेट्स, कटोरे, चहाचे कोस्टर, कॅरी बॅग आणि फूट मॅट्स अशी उपयुक्त उत्पादने बनविली जातात. या वस्तुंच्या विक्रीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. गंगा नदीचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी भारत सरकारने ग्रामीण महिलांना आपल्या एका प्रकल्पात समाविष्ट केले आहे. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यांतील 3,000 हून अधिक महिला गंगा वाचवण्याच्या कामात मदत करुन स्वतःसाठी रोजगारही मिळवीत आहेत.
झारखंडमधील शीलन देवी या उपक्रमामध्ये सहभागी आहेत. त्या पाणी प्रकल्पाशी संबंधित आहेत. गंगा आणि काठावर राहणारे लोक यांच्यात सहजीवनाचे नाते निर्माण करणे, आणि जलचरांचे संवर्धन करुन उपजीविकेच्या संधींची जोड देणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. साहिबगंज जिल्ह्यातील मस्कलैया गावात त्या राहतात. त्या गावातील आणि आजूबाजूच्या नदीच्या तलावातून तण गोळा करतात. त्यापासून विविध वस्तू तयार करतात. या वस्तू बनविण्यासाठी त्यांनी योग्य प्रशिक्षण घेतले आहे. त्या सांगतात, की तणाचे मूळ खोलवर रुजलेले असल्याने तलावातून ते काढणे हे अवघड काम आहे. ते एका विळ्याने मोठ्या कष्टाने काढले जाऊ शकते. त्यानंतर हे तण उन्हात सुकविण्यासाठी ठेवले जातात. त्यानंतर त्यापासून वस्तू बनविल्या जातात. त्या सांगतात, की या ‘हायसिंथ’ तणाच्या कोरड्या फांद्यांपासून टोपल्या, ताट, वाट्या इत्यादी बनवल्या जातात. मी दरमहा सुमारे 6,000 रुपये कमावते. वास्तविक कमाई ही उत्पादनाच्या मागणीवर अवलंबून असते.
जलशक्ती मंत्रालयाने गेल्या ऑगस्टमध्ये गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांसाठी उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यासाठी ‘जलज’ हा उपक्रम सुरू केला होता. स्थानिक लोकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. नंतर त्यांना त्याच्याशी जोडण्यात आले. हा उपक्रम उत्तर प्रदेशमध्ये 11 केंद्रांवर, पश्चिम बंगालमध्ये सहा, बिहार मध्ये पाच केंद्र, उत्तराखंडमध्ये दोन व झारखंडमध्ये एका केंद्रावर राबविण्यात येत आहे. मध्य प्रदेशसह सहा राज्यांतील गंगा, यमुना, गोमती, हुगळी आणि चंबळ नद्यांच्या काठावर वसलेल्या २६ गावांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. डेहराडूनमधील पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली भारतीय वन्यजीव संस्था स्थानिक समुदायांसोबत काम करून प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकारला मदत करीत आहे. ‘जलज’ प्रकल्पात महिलांना या तणाच्या मुळापासून उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘जलज उत्सवी महिला समूह’ केंद्रे उघडण्यात आली आहेत.
झारखंडमधील महिला डस्टबिन, बास्केट, पेन स्टँड, प्लॉटर, लाँड्री बास्केट, प्लेट्स बनवतात. त्यांची किंमत 300 रुपयांपासून सुरू होते. येथे ग्रामीण महिलांसाठी अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. जलज उत्सवी महिला समूह केंद्र ग्रामीण महिलांना प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करते. या केंद्रांवर, स्त्रिया प्रथम गंगाप्रहारींकडून वस्तू बनवायला शिकतात. नंतर त्यांच्या गावातील तण गोळा करतात. त्यापासून वस्तू तयार करतात. हे तण सहसा जवळच्या तलावांमध्ये किंवा नद्यांमध्ये सहज सापडतात. गावकरी ते घरी घेऊन जातात. मग ते उन्हात सुकवण्यासाठी ठेवतात. त्यानंतरच त्यांच्यापासून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. या माध्यमातून येथील महिला मात्र आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत.