बाबा आमटेंचे आनंदवन कुणाला माहीत नाही ? बाबांनी तेथे नंदनवन केले. समाजाने टाकून दिलेल्या माणसांना प्रेम दिले. दान नादान करते, म्हणणाऱ्या बाबांनी कुष्ठरोग्यांच्या हातांना काम दिले. हजारो कुष्ठरोगाने पिडीतांना हक्काचा निवारा दिला. हे आनंदवन महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात आहे. कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी ‘आनंदवन’ नावाचा आश्रम सन १९५२ साली बाबांनी स्थापन केला. सन 1949-50 मध्ये बाबांनी कुष्ठरोग निदान आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. कुष्ठरोग्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. सन 2008 पर्यंत हे आनंदवन 176 हेक्टर क्षेत्रापर्यंत विस्तारले. कुष्ठरोग्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा करून दिला. दुग्धशाळा, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळीपालन यासारखे व्यवसाय कुष्ठरोग्यांसाठी सुरू करून दिले. यामुळे कुष्ठरोगी स्वावलंबी झाले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला.
कुष्ठरोग्यांना आत्मनिर्भर करण्याची अखंड तपस्या ‘महारोगी सेवा समिती’ या संस्थेच्या माध्यमातून बाबांनी केली. या आश्रमात कुष्ठरोग्यांसह अंध, मूकबधीर यांच्यासाठीही विशेष शाळा काढल्या आहेत. कुष्ठरोग्यांसाठी उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन याकरिता रुग्णालय व अन्य प्रकल्पांची स्थापना केली. मुलांच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी महाविद्यालये स्थापन केली. व्यावसायिक प्रशिक्षणे सुरू केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रचंड संघर्षाने आपली कामे पूर्णत्वास नेली. भामरागड तालुक्यातील आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सुरू केला.
दुर्गंम भागातील निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या ‘माडिया’ आणि ‘गोंड’ या अतिमागास आदिवासी बांधवांसाठी सन १९७३ मध्ये हा प्रकल्प सुरू केला. एप्रिल १९७४ मध्ये बाबा आमटेंचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदा यांनी आदिवासींसाठी दवाखाना सुरु केला. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी निरनिराळे प्रकल्प येथे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून सुरु आहेत. लोकबिरादरी मध्ये डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनाथ प्राण्यांसाठी संग्रहालय सुरु केले. त्या अभयारण्यात विविध जातींचे कुत्रे, बिबटे, रानडुकरे, अस्वल, पट्टेरी मण्यार, घोणस, अजगर, साळींदर, शॅमेलीऑन, शेकरु अशा अनेक प्राण्यांचा समावेश आहे. त्या प्राण्यांवरील डॉ. आमटे यांचे प्रेम अवर्णनीय आहे. बाबांनी सोमनाथ (मूल) याठिकाणीही उपचार व पुनर्वसन केंद्र स्थापन केले आहे. सोमनाथ हे १२५० एकरवर बसलेले आहे. येथे मानवनिर्मित बंधारे व तळी बांधून शेतीच्या माध्यमातून विकास साधला आहे.