अळंबीने रोजगार दिला

उत्तराखंडच्या टिहरी जिल्ह्यातील महिलांची ही यशोगाथा आहे. काही वर्षांपूर्वी या महिला केवळ घरसंसार सांभाळत होत्या. आता मात्र त्यांच्याकडे बिलकूल वेळ नाही. एका युवकाने या महिलांच्या हाताला काम देवून त्यांना आत्मनिर्भर केले आहे. या महिला अळंबीची शेती करतात. अळंबी वेष्टनबंद केलेल्या पिशव्या विकण्यासाठी त्यांना फार दूर जावे लागत नाही. त्यांच्यासारख्या 2500 हून अधिक महिला घरी बसून ‘ऑयस्टर’ अळंबीच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. या महिलांच्या सांगण्याप्रमाणे गावातील महिलांना काही ना काही करायला आवडते. त्या आळशी बसत नाहीत. पूर्वीसुद्धा त्या घरकाम आणि शेतीची कामे करायच्या; पण आता शेतीतून त्यांना नफा मिळतो आहे, जो पूर्वी कधीच मिळत नव्हता.” हा मार्ग उत्तराखंडमधील टिहरी जिल्ह्यातील थौलधरमधील भैंस कोटी या गावातील कुलदीप बिश्त या युवकाने महिलांना दाखविला आहे. कुलदीपला सुरुवातीपासूनच अळंबीची शेती करायची होती. एमबीए झाल्यानंतर कुलदीपने बँकेत नोकरीही केली, मात्र त्याला नोकरीत रस नव्हता. पगारही चांगला होता, पण तरीही त्याचे मन समाधानी नव्हते. कुलदीपला गाव खूप आवडतो. त्याचे आजोबाही शेती करीत होते. सन 2017 मध्ये कुलदीप नोकरी सोडून गावी परतला. अळंबीचे उत्पादन करण्यास सुरूवात केली.
अळंबीचे उत्पादन संपूर्ण वर्षभर घेता येते. ती खोलीच्या आत उगवली जाते. याशिवाय या पिकाला वन्य प्राणी वा पावसाची भीती नाही. एका खोलीत अळंबी सहज पिकवता येते, म्हणून कुलदीपने अळंबीची शेती करण्यास सुरुवात केली. अळंबीची लागवड करण्यासाठी कुलदीपने त्याचा मित्र प्रमोद जुयाल यालाही सोबतीला एका वर्षाच्या आत चांगला नफा मिळू लागला. सन 2018 मध्ये त्याने ‘एफएमडी फार्म’ची नोंदणी केली. आता कुलदीप बेरोजगारांना प्रशिक्षण देतात. गावात काम करण्यासारखे खूप काही आहे, असा कुलदीपचा विश्वास आहे. त्याला उत्तराखंडमधून हा संदेश संपूर्ण देशात पोहोचवायचा आहे, की गावात खूप काही आहे. गावातील लोकांनी स्थलांतर करू नये. करण्याची गरज नाही. अळंबीची लागवड कशी करावी, याचे ते प्रशिक्षण देखील देतात. या प्रशिक्षणासाठी जवळपासच्या गावातील महिला आणि देशाच्या अनेक राज्यांतील तरुण येतात.
कुलदीपने गावातच एक अशी संस्था तयार केली आहे, जिथे अळंबीचे चांगले उत्पादन करतात. कुलदीप प्रथम जवळच्या गावातील महिलांना अळंबी लागवडीचे प्रशिक्षण देतो. नंतर महिला अळंबी पिकवतात,.कुलदीप स्वतः देखील त्यांच्याकडून खरेदी करतो. गावात चांगले पैसे कमावता येतात. कुलदीपने अळंबीची लागवड एका वेगळ्या पातळीवर नेली आहे. तो केवळ अळंबीची लागवड करीत नसून ती बाजारात विकतो. अळंबीपासून वेगवेगळी उत्पादने बनवितो, जी तो त्याच्या ‘फंगू’ या ब्रँडच्या नावाने बाजारात विकतो. सध्या त्याची दहा ते बारा उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. एवढेच नाही, तर अलीकडेच त्याच्या स्टार्टअपची उत्तराखंडच्या ‘टॉप 10 बेस्ट स्टार्टअप्स’ मध्ये निवड झाली आहे. आपला ब्रँड आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे आणि गावातील स्थलांतर थांबविणे हे त्याचे ध्येय आहे.