अयोध्येच्या मार्गक्रमणात स्वच्छतेचा संदेश

येत्या २२ जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. देशभरातील अनेक भाविक अयोध्येच्या दिशेने कूच करु लागले आहेत. असेच एक अनोखे उदाहरण नाशिकमध्ये पहायला मिळाले आहे. मुंबईतून बिनीत पांडे आणि रमणराज शर्मा या आपल्या मित्रांसमवेत शबनम शेख ही मुस्लीम युवती मंदिर सोहळ्याचा क्षण अनुभवण्यासाठी अयोध्येला निघाली आहे. विशेष म्हणजे ती हा प्रवास पायी करीत आहेत. या प्रवासादरम्यान ती नाशिकमध्ये पोहोचली. या तिघांच्याही हातात ‘ग्रीन इंडिया, क्लीन इंडिया’चे फलक असून ते या प्रवासादरम्यान स्वच्छतेचाही संदेश देत आहेत.
दरम्यान, बालपणापासून रामायण ऐकल्याने श्रीरांमाविषयी मनात आदर असल्याचे या युवतीने सांगितले. प्रवासाच्या पाचव्या दिवशी नाशिकमध्ये पोहोचून त्यांनी पुढे मार्गक्रमण सुरू केले. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आणखी जाणून घेताना त्यांच्या दर्शनासाठी अयोध्या वारी करीत असल्याचे तिने सांगितले.