सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाचा आदर्श

सिंधुदुर्गातील जिल्हा कारागृहातील कैद्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श ठेवला आहे. या कारागृहातील बंदिवानांनी भाजीपाला लागवड केली आहे. कारागृहाच्या आतील परिसरामधील दोन एकर क्षेत्रामध्ये या कैद्यांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. याठिकाणी मुबलक प्रमाणावर असलेल्या जमिनीवर लागवड करण्याचा निर्णय् घेण्यात आला. खुल्या कारागृहातील बंदी अहोरात्र या लागवडीसाठी श्रम करतात. बंदिवान कैद्यांनी कारागृहाच्या परिसरामध्ये लाल माठ, हिरवा माठ, पालक, मुळा, कोथिंबीर जवळपास २७ प्रकारच्या पालेभाज्या व गवार, शेवगा शेंग, पडवळ, भेंडी, कारले, वाल शेंग, चवळी, दुधी भोपळा, काकडी, हिरवी मिरची, वांगे, दोडके इत्यादी फळभाज्यांची लागवड केली आहे. या कारागृहातील बंदींना भाज्या दिल्या जातात. तसेच सावंतवाडी येथे वर्ग २ च्या कारागृहात भाजी पाठवली जाते. उर्वरित भाजी सरकारी दराप्रमाणे स्थानिक बाजारात विकली जाते. त्यातून ९ महिन्यांमध्ये ३ लाख ९८ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
कारागृहाचे अधीक्षक रवींद्र टोणगे यांनी कारागृहाच्या आतील जागेचे नंदनवन केले आहे. या कारागृहाच्या आतील जागा जंगलमय असून पडिक होती; टोणगे यांनी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांची सहकार्य घेतले. बंदिवान कैद्यांनी कारागृहाच्या आतील पडिक जमिनीची मशागत करून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे. त्यामुळे आता कारागृहाचे नंदनवन झाल्याचे दिसत आहे. राज्याच्या पोलीस महानिरीक्षकांनी या उपक्रमांचे विशेष कौतुक केले आहे. आता येथे एक गाय आणि वासरू आणून गोपालन सुरू केले आहे. शेतीसाठी लागणारे जीवामृत येथे तयार करून शेतीसाठी वापरण्यात येते.