पिंपळोलीवाडी मधाचे गाव होणार

ठाणे जिल्ह्यातील पिंपळोलीवाडी गावात ‘मधाचे गाव’ असा फलक खादी ग्रामोद्योग महामंडळाने लावला आहे. अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरणाजवळ हे गाव आहे. महामंडळाच्या वतीने मधमाशीपालन आणि मधोत्पादनासाठी स्थानिकांना प्रशिक्षण, प्रोत्साहन तसेच मधाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. या गावात ठाकर आदिवासी राहतात. येथील जंगलात अनेक जांभळांची झाडे असून स्थानिक आदिवासी ती जांभळे गोळा करून बाजारात त्याची विक्री करतात. त्यातून त्यांना मे आणि जून महिन्यात हक्काचा रोजगार मिळतो. या परिसरात जांभूळ मधाचे उत्पादन घेतले जाणार आहे. अन्य स्वादाच्या मधनिर्मितीलाही प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टचे आदित्य गोळे यांनी दिली.
महामंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी यासंदर्भात बदलापूर परिसराला भेट देऊन स्थानिक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी सांगितले, की मधमाशा पालन हा स्थानिक शेतकऱ्यांसाठी उत्तम उद्योग ठरेल. त्यामुळे आदिवासींना रोजगार मिळेल. तसेच पर्यटनालाही चालना मिळेल. येथील आदिवासी लोकांना मधनिर्मितीची प्रक्रिया कशी करावी, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. मांघर-महाबळेश्वर, पाटगाव- कोल्हापूर या गावांना ‘मधाचे गाव’ असा दर्जा मिळाला आहे. आता पिंपळोली-अंबरनाथ, घोलवड-पालघर या गावांना ‘मधाचे गाव’ दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी दिली.