प्राण्यांचे थंडीपासून संरक्षण

देशातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांत थंडी प्रचंड वाढली आहे. काही ठिकाणी अल्प तर काही ठिकाणी ती अजिबात नाही. परंतु, जिथे थंडीचा कडाका आहे, अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे. यामुळे भयंकर थंडीपासून प्राण्यांचे संरक्षण होईल. बिहारच्या पशु आणि मत्स्यसंपदा विभागाने पशुपालक आणि शेतकऱ्यांनी आणि प्राण्यांना थंडीच्या लाटेपासून वाचवण्यासाठी काय करावे व काय करू नये, याविषयी महत्त्वाची माहिती जारी केली आहे. या नियमावलीत म्हटले आहे की, पशूपालकांनी स्थानिक हवामान अंदाजाबाबत जागरूक रहावे. गार वाऱ्यापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी जनावरांच्या शेडला रात्रीच्या वेळी सर्व बाजूंनी झाकण्याची व्यवस्था करावी; जेणेकरून थंडीच्या लाटेपासून त्यांना थेट संरक्षण मिळू शकेल. जनावरांच्या अंथरूणासाठी कोरड्या पेंढ्याची व्यवस्था करावी. पुरेसा प्रकाश आणि उष्णता पुरविण्याची व्यवस्था अगोदरच करावी. कडुलिंबाचे तेल असलेले जंतुनाशक वापरावे.
हिवाळ्यात प्राण्यांचे शरीर झाकून ठेवावे. जनावरांना संतुलित आहार द्यावा. जास्त प्रमाणात गूळ द्यावा; जेणेकरुन शरीर उबदार राहील. स्वच्छ भांड्यातून जनावरांना गोडे पाणी दिवसातून तीन-चार वेळा द्यावे. प्राणी किंवा पक्षी आजारी पडल्यास, स्थानिक पशुवैद्यकीय रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा. आजारी, अशक्त आणि गाभण जनावरांची विशेष काळजी घ्यावी. जनावरांना हिवाळ्यापूर्वी जंतनाशक औषध द्यावे. लसीकरण करावे. जनावरांना कोरड्या व धूरमुक्त ठिकाणी ठेवावे. कोंबडी किंवा अन्य पक्षी ठेवलेल्या ठिकाणी उष्णतेची व्यवस्था करवी. बाह्य परजीवीपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी जनावरांच्या शेडमध्ये निर्गुंडी आणि लेमन ग्रासची पाने टांगावीत. प्राण्यांच्या शवांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी. जलस्रोतांपासून पुरेसे अंतर ठेवावे. आगीची आपत्ती टाळण्यासाठी सर्व नियमांचे पालन करावे. पर्यावरणाशी जुळवून घेऊन प्राणी निवारा बांधावा, ज्यामध्ये हिवाळ्यात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आणि उन्हाळ्यात किमान किरणोत्सर्ग असेल. आजारी जनावरांवर बनावट डॉक्टरांकडून उपचार करू नयेत. प्राणी आणि कोंबडी व पक्ष्यांना दमट किंवा धुराच्या ठिकाणी ठेवू नये, यामुळे न्यूमोनियाचा धोका वाढतो. हिवाळ्यात जनावरांना उघड्यावर सोडू नये. हिवाळ्यात प्राणी मेळा आयोजित करू नये. जनावरांना थंड अन्न व पाणी देऊ नये. जनावरांच्या शवांची विल्हेवाट जनावरांच्या चराईच्या मार्गावर लावू नये. सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन केल्यास पशुपालक आपल्या जनावरांचे थंड लाटेपासून संरक्षण करू शकतात.