मकर संक्रांती

‘तीळगुळ घ्या, गोड गोड बोला’ हा संदेश देणारा मकरसंक्रांती हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे. एकमेकांना सकारात्मक संदेश देऊन भोवतालचे वातावरण आनंदी करणारा हा सण आहे. इंग्रजी नववर्षाच्या प्रारंभीच हा सण येतो. मकरसंक्रांतीचा सण केवळ भारतातच नाही तर आशिया खंडातील भारताच्या शेजारी देशांमध्येही साजरा केला जातो. फक्त त्याचे स्वरुप विभिन्न असते. भारतात यादिवशी तिळाचे पदार्थ आणि गुळ सेवन केले जाते. महाराष्ट्रात घरोघरी सुवासिनी हळदीकुंकू समारंभ करतात. यादिवशी तिळगूळ वाटला जातो. मुळात हा सण थंडीच्या दिवसात येत असल्याने शरीराला ऊर्जा प्रदान करणारे पदार्थ म्हणून तिळगुळाला मान असतो. सुवासिनी तिळगुळासोबत एकमेकींना वस्तुरुपात वाण भेट देतात.
नेपाळमध्ये मकरसंक्रांती वेगळ्या स्वरूपात साजरी केली जाते. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यादिवशी हा सण साजरा करतात. हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो. यादिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. तमिळनाडूमध्ये या सणाला ‘पोंगल’ म्हणतात. कर्नाटक, केरळ, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशमध्ये याला फक्त ‘संक्रांती’ म्हणतात. बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये हा सण ‘तीला संक्रांती’ म्हणून ओळखला जातो. काही ठिकाणी मकर संक्रांतीला ‘उत्तरायण’ असेही म्हणतात. सूर्य 14 जानेवारीपासून उत्तरेकडे जाऊ लागतो. या कारणास्तव या सणाला ‘उत्तरायण’ असेही म्हणतात. बांगलादेशमध्ये या सणाला ‘शक्रेन’ व ‘पौष संक्रांती’ म्हणतात. नेपाळमध्ये ‘माघे संक्रांती’, ‘माघी संक्रांती’ व ‘खिचडी संक्रांती’ म्हणतात.
थायलंडमध्ये ‘सॉंगक्रन’, लाओसमध्ये ‘पीमा लाओ’, म्यानमारमध्ये ‘थिन्यान’, कंबोडियात ‘मोहा संगक्रन’, श्रीलंकेत ‘पोंगल’, ‘उझावर तिरुनाल’ असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार, यादिवशी भगवान भास्कर स्वत: शनीच्या घरी जाऊन त्याला भेटतात. मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्याने हा दिवस ‘मकर संक्रांत’ म्हणून ओळखला जातो. अलीकडे एकमेकांना सुंदर आणि आकर्षक शुभेच्छा पाठवून हा पारंपरिक उत्सव अधिक प्रभावी बनविला जात आहे.