प्राचीन भारतातील शेती

श्रीरामांचे युग त्रेतायुग म्हणून ओळखले जाते. भारतातील शेती ही अत्यंत प्रगत होती. त्रेतायुगातील शेतकरी अन्नधान्यापासून कडधान्य, भरडधान्य, फळे, तेलबिया इत्यादींचे उत्पन्न घ्यायचे. त्या काळी केवळ शेतीच नाही तर पशूपालनही करीत. त्यात गाय हा प्राणी फार महत्त्वाचा असे. रामराज्यात पिकांवर रोग वा किडींचा प्रादुर्भाव नव्हता, असे मानले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक उत्पादन मिळायचे. सध्या सर्वत्र श्रीरामांची चर्चा सुरू आहे. रामाशिवाय भारतीय संस्कृतीची कल्पना करणे अर्थहीन आहे. भारतात रामराज्य असताना शेती कशी होती, त्यावेळच्या शेतकऱ्यांनी ती कशा पद्धतीने केली, असे पश्न विचारले जातात. भारत हा अनादी काळापासून कृषीप्रधान देश आहे. भारतात भगवान राम आणि कृष्णाच्या काळातही शेतकरी शेती करीत होते. याचे पुरावे पौराणिक संदर्भांत आढळतात. भारतात राम आणि कृष्ण युगापूर्वीही शेती होत होती. उपनिषदे, पुराणांमध्ये, वेदांमध्ये शेतीचा, गाईगुरांचा उल्लेख आढळतो. त्यानुसार त्या काळी लोक शेत नांगरीत. जमिनीत धान्य व भाजीपाला पिकवीत. गुरे पाळत व शेळीपालन करीत.
जगातील प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्ये शेतीचा उल्लेख आढळतो. अश्विन देवतांनी राजा मनूला नांगरणी करायला शिकवल्याचा उल्लेख यात आहे. ऋग्वेदातील एका ठिकाणी अत्री यांच्याकडे शेताच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली असल्याचे आढळते. अथर्ववेदात राजा पृथुवेन्याने शेती सुरू केली होती, असे आढळते. तसेच बैलांच्या जोडीने नांगरणी केल्याचेसुद्धा वर्णन आहे. यजुर्वेदात ‘महाब्राही’, ‘कृष्णवराही’, ‘शुक्लारुही’, ‘आशुधन्य’ आणि ‘हयान’ या तांदळाच्या प्रमुख जाती होत्या. वैदिक काळातही भाताची लागवड केली जात असे. रामायण काळात राजा जनक यांना शेतात नांगरताना माता सीता सापडली. राजा जमीन नांगरत होते, यावरुन शेतीला किती महत्व होते, हे दिसून येते. महाभारतात बलरामजींच्या खादं्यावर नेहमी नांबर दिसतो. यावरून त्या काळीही शेती खूप प्रगत होती, हे समजते. सिंधू संस्कृती अतिशय प्रगत आणि सुसंस्कृत मानली जाते.
सिंधू संस्कृती ही पूर्णपणे स्वावलंबी होती. सिंधू संस्कृतीच्या अवशेषांवरून असे दिसून येते की त्या काळातील लोकांना कृषी, पशुसंवर्धन याची खूप चांगली समज होती. या काळात जहाज, रथ, बैलगाडी इत्यादी वाहतुकीची साधने लोक चांगल्या प्रकारे वापरायला शिकले होते. सिंधू संस्कृतीतील लोकांनी शेतीसोबतच गायपालन, शेळीपालनही उत्कृष्ट केले. भारतात किमान 7000 ते 13000 वर्षांपूर्वी शेतीचा विकास झाला होता. तेव्हापासून शेतीमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. नवाश्मयुगात माणसाने कंद, मुळे, फळे आणि स्वत: पिकवलेले धान्य वापरण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी हळूहळू शेती आणि अन्न उत्पादन सुरू केले. मनुष्याला पाषाणयुगापूर्वीपासून शेतीची ओळख होती. नांगरात बैलांचा वापर करून नांगरणी केल्याचा पुरावा इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीतही सापडतो. भारतातील शेती प्रगत अवस्थेत होती. त्या काळात लोक धान्याच्या रूपात महसूल भरत. सिंधू संस्कृतीमध्ये गहू आणि बार्लीचाही उल्लेख आढळतो. ज्वारी, बाजरी, कोंडो, कुटकी, इत्यादी भरडधान्ये भारतात पिकवीत.
‘पराशर’ नावाचे ऋषी भारतात होऊन गेले. त्यांनी ‘पराशर तंत्र’, ‘कृषिसंग्रह’, ‘कृषी पराशर’ हे ग्रंथ लिहिले. ‘कृषी पराशर’ मध्ये ग्रह-नक्षत्रांचा शेतीवर होणारा परिणाम, ढग आणि त्यांच्या प्रजाती, पावसाचे मोजमाप, पावसाचा अंदाज, वेगवेगळ्या काळातील पावसाचा परिणाम, शेतीची काळजी, बैलांची सुरक्षितता, शेणखत, नांगरणी यांची माहिती दिली आहे. पराशर ऋषींना शेतीबद्दल नितांत प्रेम होते. बियाणे केव्हा आणि कसे जतन करावे, पराशर ऋषींच्या ग्रंथात ढगांचे प्रकार आणि विविध ऋतूंमध्ये होणारा पाऊस यांचीही माहिती दिली आहे. गोठ्याची स्वच्छता, प्राणी, शुद्ध आणि जतन केलेले बियाणे योग्य वेळी पेरण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. जलसंधारणाचीही माहिती त्यांनी दिली आहे. भारतात, शेती आणि पशुपालन हा लोकांच्या राहणीमानाचा प्रमुख भाग आहे. भारत नेहमीच धान्यांनी भरलेला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या काळातही भारतात दूध मुबलक होते. त्याकाळातही शेती आणि पशूपालन जीवनाचा प्रमुख आधार होते.