शिवप्रेमींसाठी आनंदवार्ता

युनेस्को जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश होण्यासाठी भारताकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे मराठी आशा पल्लवीत झाल्या असून शिवप्रेमी आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. यावर्षीच्या प्रस्तावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा समावेश आहे. या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, अशी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी युनेस्को हेरीटेज लिस्ट २०२४-२५ करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने या किल्ल्यांचे नामांकन केले आहे. या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ट्वीटर’ वरुन दिली आहे.
रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बुलंद गडकिल्ल्यांची बांधणी केली. अरबी समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ला हे त्याचेच एक जिवंत उदाहरण आहे. मागील अनेक शतकांपासून हे किल्ले डौलाने उभे आहेत. आता महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांसह तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्को जागतिक वारसास्थळ यादी २०२४-२५ मध्ये नामांकन मिळाले आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास या किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळणार आहे. त्यांचा विकास व संवर्धन होणार आहे. येथील प्रत्येक शिवप्रेमीची हीच तर एक इच्छा आहे. एके काळी स्वराज्याचा कारभार चालविणारे हे किल्ले अलीकडच्या शतकात क्रियाशून्य अवस्थेत नुसतेच उभे आहेत. किल्ल्यांचे हरवलेले वैभव मनास दु:खाचा चटका देणारे आहे. त्यामुळे या बातमीने सर्वत्र आनंद पेरला आहे.