बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री हसन महमूद भारत दौऱ्यावर आहेत. ते मंगळवारी दिल्लीत पोहोचले. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी समाजमाध्यमावर लिहिले की, ”बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. हसन महमूद यांचे भारताच्या पहिल्या अधिकृत भेटीदरम्यान हार्दिक स्वागत. या महत्त्वपूर्ण भेटीमुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील मजबूत भागीदारीला आणखी चालना मिळेल.” एएनआय या वृत्तसंस्थेने बांगलादेशचा गेल्या काही वर्षांतील आंतरराष्ट्रीय सहभाग आणि भारतासोबतच्या संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ”भारत बांगलादेशचा चांगला मित्र आहे. त्यांनी १९७१ आणि १९७५ मध्ये आम्हाला पाठिंबा दिला. आम्ही भारताला आमचा शेजारी मानतो. भारतासोबत आमचे चांगले संबंध आहेत याचे मला खरोखर कौतुक वाटते.”
जानेवारीत बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी अवामी लीगच्या विजयानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी बुधवारी सलग चौथ्यांदा आपल्या ऐतिहासिक पदाची शपथ घेतली. शेख हसीना या अधिकृतपणे बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ सत्ता गाजवणाऱ्या नेत्या आहेत. चौथ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल शेख हसिना यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, “पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी बोललो. संसदीय निवडणुकीत सलग चौथ्यांदा त्यांना शुभेच्छा दिल्या. ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यशस्वी निवडणुकांबद्दल मी बांगलादेशच्या जनतेचेही अभिनंदन करतो. आम्ही बांगलादेशसोबतची आमची चिरस्थायी आणि लोककेंद्रित भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”