महाराष्ट्र शासन आणि गुगल यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘एआय फॉर महाराष्ट्र’ हा सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातील कृषी, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोजन तसेच तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी हा करार करण्यात आला. ‘गुगल इंडिया’च्या मुंढवा येथील कार्यालयात हा करार करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, ‘गुगल इंडिया’चे भारतातील प्रमुख आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता, नागपूर येथील ट्रीपल आयटीचे संचालक प्रा. डॉ. ओमप्रकाश काकडे, ‘ॲक्सिस माय इंडिया’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज संपूर्ण जग तंत्रज्ञानाने चालत असून तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासन चालविणे हा अतिशय सकारात्मक बदल आहे. एआय तंत्रज्ञानामुळे कृषी आणि आरोग्य क्षेत्रात शाश्वत बदल होण्यासह सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावेल. महाराष्ट्र शासन कायमच अशा अभिनव प्रयोगांना प्रोत्साहन देत आहे. गुगल ही जगातील मोठी तंत्रज्ञान कंपनी असून गुगलने तयार केलेली विविध नवी ॲप्लिकेशन्स लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत करतात. आपल्या सर्वांचे जीवन शेतीच्या शाश्वततेशी संबंधित आहे. राज्यात हवामान बदल, ओला आणि सुका दुष्काळ असे शेतीवर परिणाम करणारे विविध प्रश्न असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण कृषी क्षेत्रात शाश्वतता आणू शकतो; अनेक गोष्टींचा अंदाज बांधू शकतो.