रथसप्तमी

रथसप्तमी हा वसंत ऋतुच्या आगमनाचा सण आहे. हिंदू धर्मात रथसप्तमीला फार महत्व आहे. हा सूर्याच्या उपासनेचा दिवस असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. रथसप्तमी हा दिवस अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस असल्याचे मानले जाते. यादिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते. सूर्यदेवतेला लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करून कलशातून सूर्याला अर्घ्य दिले जाते. माघ महिन्यात शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या सप्तमीला ‘अचला सप्तमी’, ‘आरोग्य सप्तमी’, ‘अर्क सप्तमी’,’माघी सप्तमी’ अशीही या दिवसाला अन्य नावे आहेत. वसंत पंचमीनंतर दोन ते तीन दिवसांनी रथसप्तमी येते. यादिवशी दिलेले दान विशेष लाभदायी मानले जाते.

यादिवशी काहीजण सूर्याची साग्रसंगीत पूजा करतात. सात घोडे आणि सारथी अरुण यांसह सूर्याची पूजा केली जाते. यासाठी सूर्याची प्रतिमा रथात ठेवतात. तुळशी वृंदावनासमोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात. यादिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या भांड्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात. त्यानंतर या दुधापासून खीर बनवून सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी उपवासही केला जातो. महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकू समारंभ रथसप्तमी दिवशी संपतात.

दक्षिण भारतातही हा सण उत्साहाने साजरा केला जातो. संस्कृतीच्या दृष्टीनेही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. मलियप्पा मंदिरात रथयात्रा आयोजित केली जाते. विविध वाहने तयार करुन त्यातून देवांची मिरवणूक काढली जाते. प्राचीन साहित्यातही सूर्याच्या उपासनेचे महत्त्व आढळते. दक्षिण भारतात समुद्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये ‘ब्रह्मोत्सव’ साजरा होतो. तिरुपती येथील बालाजी मंदिरातही हा दिवस विशेष उत्साहाने साजरा केला जातो. कोणार्क येथील सूर्यमंदिरात रथसप्तमीला सूर्यनारायणाचा जन्मोत्सव साजरा करतात. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर आणि प्रशासनातर्फे व्यवस्था उपलब्ध करून दिल्या जातात. देशातील अन्य राज्यांमध्येही रथसप्तमी साजरी केली जाते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *