भारतरत्न डॉ.एम.एस. स्वामीनाथन
भारतात हरितक्रांतीसारख्या केलेल्या अभूतपूर्व कार्यासाठी भारत सरकारने डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर केला. ही देशातील समस्त शेतकरी वर्गासाठी अत्यानंदाची बातमी आहे. भारतातील अन्नसंकट संपविण्यासाठी सन 1960 च्या दशकात त्यांनी देशात घडवून आणलेल्या हरितक्रांतीसाठी जाहीर झाला आहे. स्वामीनाथन यांच्या धोरणामुळेच भारतातील कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना उच्च उत्पादन देणाऱ्या जातींचे बियाणे, पुरेशा सिंचन सुविधा आणि खतांची तरतूद करण्यात आली. परिणामी, आज देश अन्नधान्यामध्ये पूर्णपणे स्वयंपूर्ण झाला आहे.
ब्रिटीश भारतातून गेले, त्यावेळेस भारतातील उपासमारीची परिस्थिती चिंताजनक होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९६० च्या दशकापर्यंत ही परिस्थिती कायम होती. देश अन्नधान्यासाठी जगावर अवलंबून होता. त्याच वेळी, हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे भारताचे सुपुत्र मनु कोम्बू सबासिवन म्हणजेच एम.एस. स्वामीनाथन हे भारतातील भूक निर्मूलनासाठी कटिबद्ध होते. स्वामिनाथन यांनी सुधारित जनुकीय बियाण्यांद्वारे गहू आणि तांदळाचे उत्पादन वाढवून देशाला भयंकर परिस्थितीतून बाहेर काढले. देशाला धान्य उत्पादनात स्वावलंबी बनविण्याचा भरभक्कम पाया घातला.
तामिळनाडूतील ‘कुंभकोणम’ येथे ऑगस्ट 1925 मध्ये सर्जन एम.के. सांबासिवन आणि पार्वती थंगम्मल स्वामीनाथन यांच्या घरी एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म झाला. सन 1943 मध्ये बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. या दुष्काळामुळे त्यावेळी सुमारे 40 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रभावाखालीच स्वामीनाथन यांनी अन्नाच्या कमतरतेवर मात कशी करता येईल, याचा गांभीर्याने विचार केला. सन 1947 मध्ये त्यांनी कृषी विज्ञानात पदवी घेतली. त्यानंतर भारतीय कृषी संशोधन संस्था, दिल्ली येथून ‘सायटोजेनेटिक्स’मध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. जेनेटिक्स आणि वनस्पती प्रजननाचा अभ्यास केला. जेनेटिक्समधील संशोधनासाठी त्यांची युनेस्कोच्या फेलोशिपसाठी निवड होऊन ते नेदरलँड्ला गेले. त्यांनंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून सन 1952 मध्ये पीएचडी पूर्ण केली. सन 1954 मध्ये स्वामीनाथन भारतात परतले. ते केंद्रीय तांदूळ संशोधन संस्थेत काम करू लागले.
डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांनी अमेरिकन शास्त्रज्ञ नॉर्मन बारलॉग यांच्यासोबत गव्हाच्या जनुकीयदृष्ट्या सुधारित वाणांवर काम केले. भारतात त्यांनी मेक्सिकोच्या ‘बोनी’ गव्हाच्या प्रजातीचे जपानी गव्हाच्या प्रजातीमध्ये मिश्रण करून मिश्र बियाणे तयार केले. या बियाण्यापासून उत्पादकतेत लक्षणीय वाढ झाली; मात्र या संशोधनाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांना आर्थिक कमतरता भासत होती. सन 1964 मध्ये देशात दुष्काळ पडला तेव्हा सरकारने निधी दिला. याचा उपयोग करुन त्यांनी बियाण्यामध्ये आमुलाग्र बदल केले. या बियाण्यांमुळे सन 1968 मध्ये देशातील गव्हाचे उत्पादन 50 लाख टनांनी वाढले. यानंतर, या बियाण्यांचा व्यापक वापर सुरू होऊन देशातील उपासमारीची परिस्थिती संपुष्टात आली.
डॉ.स्वामिनाथन हे १९६१-७२ दरम्यान भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्लीचे महासंचालक होते. यानंतर १९७२-७९ पर्यंत ते कृषी संशोधन संस्था आणि शिक्षण विभागाचे सचिव होते. सन 1979-80 पर्यंत कृषी मंत्रालयाच्या प्रधान सचिव पदावर काम केले. यासोबतच त्यांनी 2004 ते 2006 दरम्यान राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. शेतकरी आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत पिकाच्या किंमतीपेक्षा किमान ५० टक्के जास्त मिळावी, अशी शिफारस केली होती. डॉ.स्वामिनाथन यांना त्यांच्या हयातीत 84 मानद डॉक्टरेट मिळाल्या. त्यातील 25 आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिल्या होत्या. ‘भारतरत्न’ पूर्वी डॉ.स्वामिनाथन यांना सन 1989 मध्ये ‘पद्मविभूषण’नेही सन्मानित करण्यात आले होते. सन 1971 मध्ये मॅगसेसे, सन 1986 मध्ये अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार, सन 1987 मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्कार, सन 1991 मध्ये अमेरिकेतील टायलर पुरस्कार, सन 1997 मध्ये जपानचे पर्यावरण तंत्रज्ञानासाठीचे होंडा पारितोषिक, सन 1998 मध्ये फ्रान्सचे ‘ऑर्डर डु मेरिट ॲग्री कॉल’ असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.