अन्नधान्य निर्यात

अन्नधान्याचे उत्पादन घेणे एवढेच शेतकऱ्याचे काम नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. अलीकडे काही सुशिक्षित तरुण शेतीकडे या दृष्टीकोनातून पाहतात. नवनव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करुन आपले अन्न्धान्य जगाच्या पाठीवर निर्यात करण्याचे स्वप्न पाहतात. शेती उत्पादनाबरोबरच निर्यात व्यवसाय करतात. मध्य प्रदेशमधील अमोल महाजन या तरुणाने यशस्वीपणे हा व्यवसाय करुन आदर्श ठेवला आहे. मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील दापोरा गावातील अमोल महाजन याची यशस्वी शेतकरी अशी ओळख आहे. यासाठी त्याने अमेरिकेतील नोकरी सोडली अमोल महाजन सांगतात, “मी 11 वर्षे ॲमेझॉनमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करत होतो. सन 2018 पासून माझ्या मनात असे होते की आपल्या देशात परत यावे. काहीतरी करावे. पण काय करावे कळत नव्हते. पण सन 2020 मध्ये, कोरोनाच्या पहिल्या लाटेत माझ्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी मला मायदेशी परतावे लागले. मी येथे केळीची शेती सुरू केली; कारण मी माझ्या वडिलांना शेती करताना पाहिले होते.”
अमोल पुढे म्हणतात की, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, केरळ, बिहार, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मेघालय आणि मध्य प्रदेश हे भारतातील केळीचे मुख्य उत्पादक आहेत. महाराष्ट्रातील भुसावळ, जळगाव, मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर, बिहारमधील हाजीपूर आणि उत्तर प्रदेशमधील बाराबंकी-बहराइच येथे केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. सुरुवातीला अमोलने महाराष्ट्रातील जळगाव येथे 30 हजार एकर जमीन 50 लाख रुपये भाडेतत्त्वावर घेतली. या जमिनीवर 30 हजार केळीची रोपे लावली. अमोल सांगतात की, “मी एवढी केळीची रोपे लावली तेव्हा आजूबाजूचे शेतकरी माझ्याकडे आले. मला शेतीत एवढे पैसे गुंतवायला वेडा आहेस का? केळी कोण घेणार, असा प्रश्न विचारु लागले. त्यानंतर अमोलने मायाजाल धुंडाळले. मला कळले की भारतातून केळी मोठ्या प्रमाणात अरब देशांमध्ये निर्यात केली जातात. मग मी निर्यातीबद्दल माहिती घेऊन निर्यातीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माझे मन तयार केले. मी माझी स्वतःची कंपनी ‘सॅनेरिया ॲग्रो’ नोंदणीकृत केली. तिथून पुढे व्यवसाय सुरू झाला.”
अमोलने नोव्हेंबर 2021 मध्ये केळींचा पहिला कंटेनर निर्यात केला. अमोल सांगतात, “माझ्या केळीचा दर्जा चांगला होता की मला अधिक मागण्या मिळू लागल्या. दोन वर्षांत मी सुमारे एक हजार कंटेनर निर्यात केले. पहिल्या पाच महिन्यांत माझी उलाढाल 9.5 कोटी रुपये होती. दुसऱ्या वर्षी माझी उलाढाल 32 कोटी रुपये झाली. यावर्षी 2023-24 पर्यंत आम्ही 55 कोटींच्या आसपास पोहोचू. येत्या काळात आमची उलाढाल 100 कोटींच्या पुढे जाईल.” मध्य प्रदेशसह इतर राज्यातील सुमारे एक हजार शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यांचीही केळी ते निर्यात करतात. अमोल महाजन अमेरिकेतून भारतात आल्यानंतर निर्यात सुरू केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न सुमारे 40 टक्क्यांनी वाढले आहे, कारण महाजन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देत नाहीत. शेतकऱ्यांना निर्यातदार बदलण्याचे स्वातंत्र्य आहे. शेतकऱ्यांना सामील होण्यासाठी कोणतेही नियम किंवा सूचना नाहीत. सर्व बाबी विनामूल्य आहेत. शेतकरी त्यांचा माल इतर कोणत्याही निर्यातदाराला ते देऊ शकतात. त्यांनी फक्त गुणवत्ता राखणे आवश्यक आहे.
अमोल म्हणतात, “ज्यांनी सुरवातीला मला टोमणे दिले, तेच शेतकरी आज माझ्या उपक्रमात सामील झाले आहेत. ते म्हणतात की, तुम्ही खूप पुढे जाल.” सुरुवातीला त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या बुरहानपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुणवत्तेकडे लक्ष दिले नाही. यासाठी अमोल महाजन यांनी एक चर्चासत्र आयोजित करुन शेतकऱ्यांना फळांची निगा राखण्याविषयी मार्गदर्शन केले. अमोल महाजन स्वत: शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या केळीच्या झाडांवर हीच प्रक्रिया अवलंबतात. दर महिन्याला ते 50 ते 70 शेतांवर जातात. अमोल म्हणतात, “माझ्यासोबत आल्यानंतर एका शेतकऱ्याने अंदाजे 20 हजार रुपयांची बचत केली आहे. आमचा दर बाजारापेक्षा फक्त एक रुपया जास्त आहे. गेल्या वर्षी आम्ही बुरहानपूर जिल्ह्यातून 650 वाहने भरली. शेतकऱ्यांची मध्यस्थांना दिली जाणारी रक्कम वाचवली. जवळपास 300 शेतकऱ्यांचे सुमारे 1 कोटी 31 लाख रुपये वाचवले. याचा परिणाम असा आहे की इतर शेतकरी आमच्या मागे लागले आहेत. यावर्षी आमचे लक्ष्य 3000 वाहने पाठविण्याचे आहे.” अमोल महाजन यांची कंपनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीही काम करीत आहे.