‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेला सध्या रंजक वळण लागलेले दिसत आहे. एकमेकांचा तिरस्कार करणारे मुक्ता आणि सागर आता एकत्र येताना दिसत आहेत. सावनी मुक्ता व सागरला मुद्दाम भडकवण्यासाठी जाते. मुक्ता दागिने घेऊन पळून गेली असे तिला वाटते. त्यामुळे ती सागरला म्हणते की, हर्षवर्धनने मला खूप सारे लेटेस्ट दागिने आणून दिले आहेत. त्यातले तुला काही देऊ का? पण तुझी लेटेस्ट बायको जर पळून गेली असेल तर मी परत येऊ शकत नाही. यावर सागर तिला म्हणतो की, तू दारात हात जोडून जरी उभी राहिलीस तरी मी तुला पुन्हा घरात घेणार नाही; कारण माझ्या बायकोची जागा मुक्ताने केव्हाच घेतली आहे.
सागर ठामपणे मुक्ताची बाजू मांडत असतो. तो म्हणतो की, तू नेहमी स्वतःचा विचार करत आलीस आणि मुक्ता कुटुंबाचा करते. तू घर तोडलेस आणि तिने बांधून ठेवले. तुझी आणि तिची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. त्यानंतर तो सावनीचे आभार मानत म्हणतो की, तू मला सोडून गेलीस त्यामुळे मला मुक्ता मिळाली. सईला एक चांगली आई मिळाली, माझे कुटुंब पूर्ण झाले .
पुढच्या सीनमध्ये मुक्ता सागरचा विचार करताना दिसते. सागर सांगत असूनही आपण त्यांची मदत घेतली नाही याचा त्यांना राग आला असेल का असे तिला वाटत असते. सागर घरी येतो तेव्हा तो मुक्ताचा विचार करत असतो. त्यानंतर मुक्ता आणि सागर एकत्रच एकमेकांना ‘सॉरी’ म्हणतात. त्यानंतर दोघेही एकमेकांवर विश्वास ठेवण्याचे वचन देतात.