जाळीचा देव

जालना जिल्ह्यात अजिंठ्यापासून २८ किलोमीटर आणि बुलढाण्यापासून २५ किलोमीटरवर महानुभावपंथीयांचे ‘जाळीचा देव’ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथामधील भाविकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. येथे श्री चक्रधरस्वामी ही काळ वास्तव्यास होते. औरंगाबादपासून जाळीचादेव अंतर १२१ किमी आहे. जळगावपासून जाळीचा देव अंतर ९३ किमी आहे. जालनापासून हे अंतर १३२ किमी. आहे. जाळीचा देव येथे जाण्यासाठी एस.टी.च्या बसेस मिळतात. हे स्थान सह्याद्री पर्वतावर उत्तर सोंडेवर पूर्वाभिमुख मंदिरात आहे.

महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रभ्रमण करीत असताना येथे आले. ते गंगातीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, चांगदेव, हरताळा येथे पोहोचले. हरताळा येथून स्वामी सावळदबारा येथे आले. वालसावंगी येथे जाताना वाटेत त्यांना अरण्य लागले. करवंदाच्या जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी थांबले असताना त्याठिकाणी त्यांना दोन वाघिणीची पिल्ले दिसली. ते पिल्लांना मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्याठिकाणी येऊन गर्जना करू लागली . स्वामींनी तिच्याकडे पाहताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे वागू लागली. ही गोष्ट वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली. म्हणूनच या तीर्थक्षेत्राला ‘जाळीचा देव’ हे नाव पडले. येथे जाळीच्या वेलांखाली दगडमातीचा ओटा बांधला होता. येथील सावळदेवा गावचे वृद्ध गुराखी सांगतात, की पौर्णिमेचा दिवस असल्यावर येथील गुराखी या स्थानावर आवर्जून जात. या स्थानावर तुरळक भक्तांनी अर्पण केलेले नारळ असत.. साधारण चार ते पाच नारळ मिळायचे. सर्व गुराखी एकत्र येऊन हे नारळ फोडून खात.

वाघोदा-जळगाव येथील भक्त कै. लक्ष्मणराव पाटील आपला कुष्ठरोग चांगला होण्यासाठी येथे आले होते. त्यांनी एकवीस दिवस उपवास करून नामस्मरण केले. एकविसाव्या दिवशी पहाटे त्यांना एक साधू स्वप्नात दिसले. त्यांनी आशीर्वाद दिला. त्यानंतर थोड्याच दिवसात श्री. पाटील निरोगी झाले. त्यानंतर त्यांनी या स्थानाभोवतीची झाडेझुडुपे काढून सन १९३८ मध्ये मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. सन १९४२ मध्ये सभामंडपाचे काम पूर्ण होऊन कलशारोहण समारंभ थाटात झाला. याठिकाणी भक्ताचा शारीरिक, मानसिक थकवा दूर होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *