पर्यावरणपूरक पत्रावळी निर्मिती

पत्रावळी ही भारताच्या प्राचीन भोजन संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. सध्या ती भारतातून हद्दपार झाली आहे, मात्र विदेशात उत्पन्नाचे साधन बनत आहे. भारतीय संस्कृतीचे अंग असणाऱ्या अनेक गोष्टी आज पाश्चात्य संस्कृती आपल्यामध्ये सामावून घेत आहे. भारतीय संस्कृतीत निसर्गाला महत्त्वाचे स्थान आहे. अलिकडे आपण आधुनिकीकरण आत्मसात करत आहोत. त्यामुळे निसर्ग आपल्या जीवनातून आणि संस्कृतीमधून दूर होत चालला आहे. तरीही जनजागृतीमुळे पत्रावळी करण्याचे उद्योग आता सुरु होताना दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी एखाद्याच्या घरी पूजा, लग्नसमारंभ किंवा एखादे शुभ कार्य असेल तर पत्रावळीमधून जेवण वाढण्याची प्रथा होती. आजच्या घडीला पानांच्या पत्रावळी कुठे दिसत नाहीत. त्याऐवजी चकाकणाऱ्या कागदी पत्रावळी दिसतात. पण आता काही तरुण सुपारी, केळीच्या पानांपासून द्रोण, पत्रावळी बनवून त्याची विक्री करीत आहेत.
भारतात पळसाच्या, फणसाच्या, सुपारीच्या पानांपासून अनेक वर्षांपासून पत्रावळी व द्रोण बनविण्यात येत आहेत. आधुनिकीकरणामुळे पत्रावळीची जागा कागदी पत्रावळींनी घेतली आहे. पर्यावरणपूरक पत्रावळी ‘वापरा आणि फेकून नष्ट करा’ या पद्धतीच्या असल्याने निसर्गाला प्रदूषणमुक्त ठेवतात. यामुळे पत्रावळी आणि द्रोण यांचा उपयोग सर्व ठिकाणी आढळून येतो. यातून बऱ्यापैकी रोजगार मिळवता येतो. द्रोण,पत्रावळी प्रत्येत घरात वापरल्या जातात किराणा माल दुकाने, स्टेशनरी दुकाने, पानपट्टी, मंगल कार्यालय, सार्वजनिक कार्यक्रम इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात यांचा वापर होतो. पत्रावळी, द्रोण बनवून विकायचा उद्योग सुरु करायचा झाल्यास ऑर्डर प्राप्त करून उत्पादन करता येते. जिथे आपण उत्पादन घेता त्याच ठिकाणी विक्रीसाठी फलक लावून विक्री करू शकता आठवडी बाजाराच्या ठिकाणी विक्रीचे दालन उघडू शकता. न विटणारे, न सडणारे, कायम टिकून राहणारे हे उत्पादन आहे. त्या साठी आपण स्वतः हा उद्योग सुरु करू शकता .
यासाठी हायड्रॉलिक मशीनची आवश्यकता असते. या मशीनद्वारे आपण दर दिवशी कमीत कमी दहा हजार पत्रावळी तयार करू शकता. होलसेल ऑर्डर पूर्ण करण्यास या यंत्राचा चांगला उपयोग होतो. पत्रावळी आणि द्रोणची होलसेल विक्री केल्यास तर प्रति नग २५ पैसे नफा मिळाला तरी १० हजारचे दिवसाला २५०० रुपये कमावू शकता. वेगवगळ्या प्रकारच्या अशी हायड्रॉलिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे.