जालना शहरातील राजूर परिसरात एक देखणे गणेश मंदिर आहे. शहरापासून २५ किंमी अंतरावर हे मंदिर आहे. गणेश चतुर्थी, अंगारकी चतुर्थी तसेच विनायकी चतुर्थीदिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून येथे परिवहन महामंडळाच्या बसगाड्या उपलब्ध असतात. गणेश पुराणानुसार, हे स्थळ भगवान गणेशाच्या संपूर्ण पिठांपैकी एक आहे, असे भाविक मानतात.
हे गणेश मंदिर फार सुंदर आहे. येथे जाताच डोळ्यांचे पारणे फिटते. येथील गणेशमूर्ती मोहक व प्रसन्न आहे. येथे बोललेली इच्छा पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. राजूरच्या या गणेश मंदिराजवळ चांदई धरण असून हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे.
हे मंदिर दिवसभर खुले असते. मंदिरात कोणतेही शुल्क आकारले जात नसून सर्वांसाठी खुले आहे. येथे अंगारकी चतुर्थीस गर्दी असतेच. भाविक आवर्जुन जातात; परंतु हिवाळ्यापासून पुढे पावसाळ्यापर्यंत कधीही येथे जाऊ शकता.