प्राचीन काळी कल्याण बंदरात उतरणारा माल जुन्नर या बाजारपेठेत नेण्यासाठी विविध व्यापारी मार्गांचा वापर होत होता. यातील कल्याण – म्हसा – अहुपे घाट – जुन्नर हा एक मार्ग होता. हा व्यापारी मार्ग आणि अहुपे घाटावर नजर ठेवण्यासाठी सिध्दगड या किल्ल्याची निर्मिती केली होती. ठाणे जिल्ह्यातील सिध्दगड किल्ला हा भिमाशंकर अभयारण्याचा भाग आहे. हा गड वनखात्याच्या जागेत असल्यामुळे इथे फिरण्यावर बंधने आहेत.
नारीवली गावातून या गडावर जाता येते. सिध्दगड माचीवर गाव सिध्दगडवाडी आहे. या माचीवर देऊळ आहे. देवळाजवळ शिलालेख पहायला मिळतात. मंदिराच्या मागच्या बाजूला तोफेचे गोळे आहेत. सिध्दगड माची वरून सिध्दगडाच्या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जातांना दोन कातळात खोदलेल्या गुहा आढळतात. यातील दुसऱ्या गुहेपासून पुढे बाले किल्ल्यावर जाणारी वाट अतिशय अरुंद आहे. माथ्यावर बुरुज व पाण्याचे टाके आहेत.