बीड जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांपैकी श्री क्षेत्र कपिलधार हे एक मनोहर ठिकाण आहे. बीड शहराच्या दक्षिणेला १९ किमी. अंतरावर मांजरसुभा हे गाव आहे. बीड, अहमदनगर उस्मानाबाद व अंबेजोगाईस जाणारे रस्ते याठिकाणी एकत्र येतात. येथे टेकड्यांच्या परिसरात ‘कपिलधार’ नावाचा धबधबा आहे.
कपिलधार येथे मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी आहे. पावसाळ्यात येथील बरेच नदीनाले ओसंडून वाहू लागतात. निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारे धबधबे देखील खळखळून वाहतात. कपिलधार धबधबा उंचावरून कोसळत असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. कपिलधार धबधबा हा धुळे-सोलापूर राज्य महामार्गालगत आहे.
मन्मथस्वामी यांच्या संजीवनी समाधीला ४५० वर्षे होऊन गेली आहेत. या क्षेत्राला पर्यटन विभागाचा ‘ब’ दर्जा आहे. पावसाळ्यामध्ये येथे मोठी गर्दी पहायला मिळते.
कार्तिकी पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. धार्मिक महोत्सव असतो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून लाखो भाविक या उत्सवासाठी येतात. माघ शुद्ध पंचमीला स्वामींचा जन्मोत्सव व फाल्गुन चतुर्थीला समाधीस्थ झालेला दिवस असतो. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरते.
मंदिर सकाळी 5 वाजता दर्शनासाठी खुले केले जाते. दुपारी 12 वा. आरती होते. संध्याकाळी 5 ते 7 शिव भजन होते. रात्री दहा वाजता मंदिर बंद केले जाते.