बदलत्या काळानुसार सासू-सून यांच्यातील नातेही बदलू लागले आहे. सासू-सुनेचे नाते पहिल्या दिवसापासून सहज होऊ शकत नाही,हे स्वाभाविक आहे. यासाठी थोडा वेळ लागू शकतो. वर व वधू दोघांना एकमेकांच्या आवडीनिवडी, भावना, सवयी आणि जीवनशैलीशी जुळवून घ्यावे लागते. लग्नानंतर दोघांना प्रत्येक लहानमोठ्या गोष्टींशी चर्चा करायला आवडते. मुलींस असे वाटते की, नवीन घरात फक्त नवराच तिला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकेल; परंतु सासू-सासऱ्यांवरही थोडा विश्वास ठेवा. नात्याला वेळ दिला तरच ते अधिक घट्ट होईल. सासू-सासऱ्यांसोबत छोट्या-छोट्या समस्यांवर चर्चा करा. त्यावर उपाय सापडतो की नाही ते बघा ! याशिवाय सासूबाईंना त्यांच्या कामात मदत करा, एकत्र टीव्ही पहा, फिरायला जा, त्यांना खरेदीला घेऊन जा, कोटुंबिक सहलीचे नियोजन करा. आपला हा प्रयत्न नक्कीच नात्यात घट्टपणा आणेल.
सून आल्यानंतर आईला आपल्या मुलासाठी काही करायचे असेल तर त्याचे वाईट वाटून घेऊ नका. तीच होती जिने तुमच्या आधी त्याची काळजी घेतली होती. ही सवय बदलायला वेळ लागेल. भांडण्याने आणि गुदमरून आयुष्य जगल्याने तणाव वाढतो आणि नाते बिघडते. एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्यावर बोलूनच उपाय सापडतो. समोरची व्यक्ती तुमच्या भावना स्वतः समजून घेईल, असे होत नाही. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात अनेक गोष्टींबाबत समस्या निर्माण होतात. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यावरही परिणाम होऊ लागतो. जर तुम्हाला कुटुंब सांभाळण्यात अडचण येत असेल, तर सासू सासऱ्यांकडून सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. त्यांचा अनुभव तुम्हाला खूप मदत करू शकतो.
तुम्हाला सासू-सासऱ्यांसोबतचे नाते सुधारायचे असेल, तर चुकूनही तुमच्या सासूची तक्रार करू नका. मुलगा अनेकदा सासू-सून यांच्या भांडणात अडकतो. काही वेळा यामुळे पती-पत्नीच्या नात्यात बिघाड होतो. समजूतदारपणा आणि कौशल्याच्या आधारे सासू-सासऱ्यांसोबत जुळवून घ्यायला हवे. आपण त्यांच्याकडून दुखावले जात असाल तर विश्वासू मित्र,मैत्रीण, बहीण किंवा आईशी बोलू शकता