देशात साजरा केला जाणारा प्रत्येक सण समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो. ओणम हा प्राचीन सण साजरा करताना केरळीय समाजामार्फत सांस्कृतिक वारसा जपला जातो. सर्वांनी आजही समर्पक असणाऱ्या एकता, करुणा आणि सेवा या मूल्यांचे पालन करावे. बॉम्बे केरळीय समाजाने सातत्याने नवोदितांना पाठिंबा दिला आहे. केरळच्या समृद्ध संस्कृतीला चालना दिली आहे. आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण आदी क्षेत्रांत अमूल्य सेवा दिली आहे, हे कौतुकास्पद आहे. आपण कुठेही राहिलो तरीही आपले मूळ विसरू नये, असे प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन यांनी केले.
‘बॉम्बे केरळीय’ समाजाने मुंबईत ओणम उत्सव साजरा केला. यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते. समाजासाठी योगदान देणाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘विशाल केरलम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बॉम्बे केरळीय समाजाचे अध्यक्ष डॉ. एस. राजशेखरन, मानद सचिव विनोदकुमार नायर, उपाध्यक्ष प्रदीपकुमार यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. प्रारंभी अध्यक्ष डॉ. राजशेखरन व नायर यांनी समाजाच्या कार्याची माहिती दिली.