ए. टी. ई. चंद्रा फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार

‘जलयुक्त शिवार योजना २’ अंतर्गत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ या योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीबाबत ए.टी.ई.चंद्रा फाऊंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभागात मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशनच्या अमित चंद्रा यांना पत्र लिहून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेमध्ये सक्रीयपणे सहकार्य करण्याविषयी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीस मान देऊन फाउंडेशनने या योजनेसाठी हा सामंजस्य करार केला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मृद व जलसंधारण विभागाने फाऊंडेशनला सर्व ते सहकार्य करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागाला दिल्या आहेत.

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेमध्ये ए.टी.ई. चंद्रा फाऊंडेशन सक्रीय सहभागी होणार असल्यामुळे राज्यातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यासोबतच जमिनीची सुपिकता वाढून शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्येही चांगली वाढ होण्यात मदत होणार आहे.

या सामंजस्य करारानुसार या योजनेसाठी ए.टी.ई. चंद्रा फाउंडेशन तांत्रिक सहाय्यासह, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्वरुपात मनुष्यबळ सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. फाऊंडेशनने विकसित केलेल्या अवनी ग्रामीण ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने योजनेतील कामांच्या डेटाचे संकलन आणि नियंत्रण करण्यात येणार आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *