सुदानमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या यादवी युद्धात सुदान सशस्त्र दलांनी (SAF) लक्षणीय प्रगती केली आहे. सुदानच्या सैन्याने बंडखोर रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) ला हुसकावून लावले आहे आणि देशाच्या राजधानीसह महत्त्वाच्या भागांवर ताबा मिळवला आहे. राष्ट्रपती कार्यालय आणि खार्तूमच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा केल्याच्या घोषणेनंतर, हजारो लोकांचे प्राण घेणाऱ्या या युद्धात आता शांतता येईल असे वाटत होते, परंतु सुदानचे लष्करप्रमुख अब्देल फताह अल-बुरहान यांनी अजूनही पूर्ण विजयाचा दावा करण्यास नकार दिला आहे. लष्करप्रमुखांच्या या विधानावरून असे दिसते की सुदानमधील युद्ध बराच काळ चालू राहणार आहे. “सुदानच्या प्रत्येक कोपऱ्यातून शेवटचा बंडखोरही नष्ट होईपर्यंत विजयाचा आनंद पूर्ण होणार नाही,” असे सुदानीज सशस्त्र दलाचे (एसएएफ) प्रमुख अब्देल फताह अल-बुरहान यांनी शनिवारी सांगितले.
शनिवारी लष्कराने नवीन भागांवर नियंत्रण मिळवण्याची घोषणा केली. यापूर्वी SAF ने राजधानीचा बहुतांश भाग ताब्यात घेतला होता, जो दोन वर्षांच्या विनाशकारी युद्धात एक निर्णायक विजय होता. ज्यामुळे जगातील सर्वात मोठ्या मानवतावादी संकटाला जन्म मिळाला आहे. लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या सैन्याने आता पश्चिम ओमदुरमन येथील सौक लिबियातील बाजारपेठेचा ताबा घेतला आहे. आरएसएफ पळून गेल्यानंतर राहिलेली शस्त्रे आणि उपकरणेही सैन्याने जप्त केली आहेत. सौक लिबिया हे सुदानमधील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांपैकी एक आहे, त्याचा ताबा हा लष्करासाठी एक मोठा विजय आहे.