भारताच्या परकीय चलन बाजारात गेल्या ४ वर्षात दुपटीने वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बाली येथे आयोजित एका परिषदेत ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, भारताचा परकीय चलन बाजार सन २०२० मध्ये ३२ अब्ज डॉलर्स होता. तो वाढून सन २०२४ मध्ये ६० अब्ज डॉलर्स झाला आहे. गेल्या काही वर्षात भारतीय वित्तीय बाजार अधिक गतीशील आणि लवचिक झाले आहेत.चलन बाजारांचाही विस्तार झाला आहे. सन २०२० मध्ये यात ३ लाख कोटी रुपयांचा दैनंदिन व्यवहार होत असे. त्यात वाढ होऊन २०२४ मध्ये हे प्रमाण साडे पाच लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचले आहे.
भारतीय वित्तीय बाजारांचा मूलभूत आधार अत्याधुनिक असून यांची पारदर्शकता जगातील सर्वश्रेष्ठ बाजारांच्या बरोबरीची आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.