
पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन दि. २२ एप्रिल ते महाराष्ट्र दिन १ मे या कालावधीत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. या उपक्रमांतर्गत मंत्री पंकजा मुंडे स्वतः २२ एप्रिल रोजी मुंबईतील पवई तलाव येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.
दि . 28, 29 व 30 एप्रिल या तीन दिवसांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून घोषवाक्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यातील उत्कृष्ट घोषवाक्य तयार करणाऱ्यांचा सन्मान महाराष्ट्र दिनानिमित्त करण्यात येईल. या घोषवाक्याचा समावेश महाराष्ट्र दिनाच्या संचलनात देखील करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यामधून तीन घोषवाक्य घेऊन राज्यस्तरावर तीन उत्कृष्ट घोषवाक्य निवडण्यात येतील. याचा वापर महाराष्ट्राच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या जाहिरातींमध्ये केला जाईल. उत्कृष्ट तीन घोषवाक्य करणाऱ्यांचा राज्यस्तरावर सन्मान करण्यात येईल. हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे.