
जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सौदी अरेबिया दौरा अर्धवट थांबवला. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावर जगभरातील देश प्रतिक्रिया देत आहेत.
सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून ठार झालेल्या निष्पाप लोकांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.
भारताने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आखाती देश आणि भारताचा मित्र संयुक्त अरब अमिरातीने या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य करून झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त अरब अमिराती निषेध करते, ज्यामध्ये डझनभर निष्पाप लोक मारले गेले आणि जखमी झाले.’
इराणनेही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. इराणी दूतावासाच्या ‘एक्स’ हँडलने लिहिले की, ‘नवी दिल्लीतील इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचा दूतावास जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. यामध्ये मोठ्या संख्येने निष्पाप लोक मृत्युमुखी पडले, आणि जखमी झाले. आम्ही भारत सरकार आणि भारतातील जनतेप्रती, विशेषतः या हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे होण्यासाठी, आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.