भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना संयुक्त राष्ट्राकडून आवाहन करण्यात आले आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक पवित्रा घेतला आहे. पाकिस्ताननेही कडक प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानने याला युद्धाची चिथावणी असे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील वातावरण तंग झाले आहे. ही तणावपूर्ण परिस्थिती आणखी वाढू नये, म्हणून संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी भारत आणि पाकिस्तानला अधिकाधिक संयम बाळगण्याचे आवाहन केले. दोन्ही देशांच्या सरकारांनी अधिकाधिक संयम बाळगत परिस्थिती आणखी बिघडू नये, हे सुनिश्चित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील कोणतेही प्रश्न अर्थपूर्ण परस्पर संवादाद्वारे शांततेत सोडवले जाऊ शकतात आणि ते सोडवले पाहिजेत, असे ते म्हणाले.