स्वच्छ भारत मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

29Apr, 2025
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत ‘कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ ही मोहिम ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. ही मोहिम दि.१ मे ते दि. १५ सप्टेंबर या कालावधीत होणार असून या मोहिमेत लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, बचतगट, युवक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
राज्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा- २ अंतर्गत वैयक्तिक शौचालय व सार्वजनिक शौचालयांसह घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मैलागाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, गोबरधन, इ. या घटकांची कामे प्रगतीपथावर आहेत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. गावातून कचरा जमा करून कंपोस्टसाठी भरण्याचा कालावधी १ मे ते १० मे दरम्यान असेल. प्रक्रिया, देखभाल व पडताळणी कालावधी हा ११ मे ते ३१ ऑगस्ट असेल. नाडेप खड्डा उपसण्याचा कालावधी १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरपर्यंत असेल.