केंद्र सरकारने १६ पाकिस्तानी युट्युब चॅनेल्सवर बंदी घातली आहे. गृहमंत्रालयाच्या शिफारशीनंतर सरकारने ही कारवाई केली आहे. या चॅनल्सवरून भारताबद्दलची चुकीची, द्वेषपूर्ण तसेच भ्रमित करणारी माहिती पसरवली जात होती. भारतीय सुरक्षा दलांबाबत चुकीची माहिती पसरवण्याचा आणि देशात धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न या चॅनल्सच्या माध्यमातून करण्यात येत होता. पहलगाम हल्ल्यानंतर या चॅनल्सवरून चुकीची माहिती प्रसारित करण्याचे प्रमाण वाढले होते. या चॅनलवर सरकारची करडी नजर होती. राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता सरकारने ही कारवाई केली असून अश्या प्रकारच्या इतर माध्यमांवरही सरकार नजर ठेऊन आहे.
दरम्यान, मुंबई शहरात राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांची ओळख मुंबई पोलिसांनी पटवली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या सर्वांना देश सोडून जाण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. विशेषत: अल्पकालीन आणि पर्यटक व्हिसावर आलेल्या व्यक्तींवर ही कारवाई करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर भारत सोडून जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या रविवार संध्याकाळपर्यंत ५३६ इतकी झाली होती.