भारत कोणत्याही दबावाखाली येणार नाही.केवळ निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांना आश्रय देणाऱ्यांनाही शिक्षा केली जाईल, असे भारताने अमेरिकेसह सर्व देशांना स्पष्ट केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर अनेक देश भारताने याची चौकशी करावी, किंवा पाकिस्तानशी संवाद साधून शांतता प्रस्थापित करावी, असे सुचवत आहेत.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताची ही भावना त्यांचे अमेरिकन समकक्ष मार्को रुबियो यांना कळवली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ती अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांना कळवली आहे.
गेल्या २४ तासांत भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. परराष्ट्र मंत्री रुबियो आणि संरक्षण मंत्री हेगसेथ यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. भारताचा राग देखील समजून घेतला, परंतु जयशंकर आणि राजनाथ सिंह यांच्या वृत्तीवरून हे स्पष्ट होते की, भारत यावर समाधानी नाही.