शाळेत सुरक्षिततेच्या अनुषंगाने नवे निर्देश जारी

महाराष्ट्र शासनाने शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन आणि व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या निर्देशांचे पालन शाळांना बंधनकारक असून, त्यांचे उल्लंघन केल्यास शाळेच्या मान्यतेवर परिणाम होऊ शकतो. शाळेच्या प्रवेशद्वार, कॉरिडॉर, वर्गखोल्यांचे प्रवेशद्वार, स्वच्छतागृहांच्या बाहेर, खेळाचे मैदान इत्यादी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे. किमान एक महिन्याचे फुटेज राखणे आवश्यक आहे. शाळेच्या एक किलोमीटर परिसरात पान टपरी किंवा तंबाखूजन्य उत्पादने विकणाऱ्या दुकानांवर बंदी घालण्यात आली आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी आवश्यक आहे. क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम्स (CCTNS) चा वापर करून ही पडताळणी केली जाईल.
विद्यार्थ्यांची सकाळी, दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस हजेरी घेणे आवश्यक आहे. अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने नियमित समुपदेशन सत्रे आयोजित केली जातील. खासगी शाळांनी प्रशिक्षित समुपदेशकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत. स्वच्छतागृहाजवळ संबंधित लिंगाच्या परिचराची नियुक्ती आवश्यक आहे. सर्व स्वच्छतागृहांमध्ये पाणी, प्रकाश आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी घंटा किंवा बजर असावा. शाळेच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि महिला परिचराची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. बस चालक आणि कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी आवश्यक आहे.