पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने आणि सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे कल्याण, डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर चुनाभट्टी स्थानकाजवळ पाणी साचल्यामुळे वाशी ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या पनवेल ते वाशी मार्ग सुरु आहे, तर ट्रान्स-हार्बर लाईनवर गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, शक्यतो घरातच राहावे आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत अपडेट्सवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपवरून वेळापत्रक तपासा. शक्य असल्यास पर्यायी वाहतुकीचा वापर करा. गर्दीच्या वेळेत प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीवर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करावे.