कमी पर्जन्यमानाच्या भागांसाठी अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करावेत. राज्यासाठी सर्वोत्तम पीक पद्धती तयार कराव्यात. शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ सक्तीचा करावा. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नागपूर येथील केंद्रीय कृषी संशोधन परिषदेत कृषी आणि ग्रामविकास विभागांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. हवामानानुसार पीक वाण विकसित करणे, प्रगत बियाणे, सेंद्रिय खत, स्मार्ट सिंचन, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर त्यांनी भर दिला. मनरेगातील प्रगतीबद्दल मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे सांगून ‘लखपती दीदी’ योजनेंतर्गत एक कोटी महिलांना स्वावलंबी करण्याचे लक्ष्य जाहीर केले. यावेळी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी व ग्रामविकास क्षेत्रातील उपक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.