भारताने जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि जागतिक नेत्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल माहिती देण्यासाठी सात बहुपक्षीय शिष्टमंडळांची घोषणा केली आहे. भारताच्या या राजनैतिक कृतीचे पाकिस्तानने अनुकरण केले आहे. पाकिस्ताननेही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ‘शांततेकरिता आपली बाजू मांडण्यासाठी’ परदेशात शिष्टमंडळे पाठविण्याची घोषणा केली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ ने पुन्हा एकदा पाकिस्तानचे दहशतवादासोबतचे संबंध उघड केले आहेत. या ऑपरेशनअंतर्गत भारताने केलेल्या मोठ्या हल्ल्यानंतर, शेजारी देश आपली प्रतिमा वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेचेही अनुकरण केले होते. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी, ते देशाची भूमिका मांडण्यासाठी माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ जगातील महत्त्वाच्या राजधान्यांमध्ये पाठवतील, असे जाहीर केले आहे.