मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. या भागासह पश्चिम महाराष्ट्रातही पुढचे पाच दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
प्रामुख्याने सातारा, पुणे, कोल्हापूर , नाशिक, अहिल्यानगर, या भागांना वादळी पावसाचा तडाखा बसेल. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातही मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यादरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’सुद्धा जारी करण्यात आला आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सध्याच्या घडीला अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. राज्याच्या बहुतांश भागांना सध्या अवकाळी पावसाने झोडपून काढले असून शेतपिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. वादळी पावसाच्या अनुषंगाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.