केंद्र सरकार देशभरात ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविणार आहे. कमी क्षेत्रात आणि कमीत कमी खर्चात चांगले उत्पादन मिळावे यासाठी २९ मे ते १२ जून या कालावधीत चालणाऱ्या या मोहिमेत सुमारे १.३० कोटी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जाईल.
यामुळे देशातील कृषी नवोपक्रम आणि जागरूकतेला एक नवीन दिशा मिळेल. यादरम्यान कृषी शास्त्रज्ञ, राज्य सरकारे, एफपीओ आणि प्रगतीशील शेतकऱ्यांचे २१७० पथके देशभरातील ६५ हजारांहून अधिक गावांना भेट देतील. स्थानिक हवामान, मातीची गुणवत्ता, पोषक तत्वे, पाऊस आणि सिंचन परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना योग्य पिके, बियाणे, खते आणि तंत्रज्ञानाची माहिती देतील. प्रत्येक पथकात किमान चार शास्त्रज्ञ असतील.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी माध्यमांना सांगितले की, “खरीप आणि रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी दरवर्षी शेतात वैज्ञानिक ज्ञान घेऊन उत्पादन वाढविण्याची आणि खर्च कमी करण्याची ही मोहीम राबवली जाईल. प्रगत शेतीची माहिती दिली जाईल.”