फळांवरील कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी मोहीम

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अवैधपणे फळांवरील कृत्रिम रंगांचा वापर रोखण्यासाठी तपासणी आणि विशेष मोहीम राबविण्याचे आवाहन केले आहे. सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्त आणि ‘एफएसएसएआय’च्या प्रादेशिक संचालकांना फळांच्या बाजारपेठा आणि मंडईंवर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 

यासह फळांच्या कृत्रिम पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय झाला आहे. ज्या ठिकाणी फळांची साठवणूक केली जाते तिथे, जर कॅल्शियम कार्बाइडचा वापर आढळला तर, त्याला परिस्थितीजन्य पुरावा मानून खाद्य सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

याशिवाय जेथे कृत्रिमरित्या केळी पिकवताना रसायनांचा वापर करतात, त्यांच्यावरही कारवाई केली जावी, असेही निर्देश दिले आहेत. यासंदर्भात, प्राधिकरणाने सर्वसमावेशक मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत, त्या www.fssai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *