कडू कारले आणि लांबसडक दोडके
कारली व दोडका यासारख्या वेलवर्गीय भाज्यांना मांडव किंवा बांबूचा आधार द्यावा लागतो. दोडक्याला ‘शिराळे’ असेही म्हणतात. कारली व दोडका यांच्या वाढीची सवय व मशागतीची सुत्रे जवळजवळ सारखीच आहेत. महाराष्ट्रामध्ये कारल्याखाली अंदाजे 453 हेक्टर क्षेत्र असून दोडका या पिकाखाली 1147 हेक्टर क्षेत्र आहे. कारल्याला परदेशात व मोठ्या शहरात, तर दोडक्याला स्थानिक बाजारपेठेत नेहमीच मागणी असते. या दोन्ही पिकांची पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवड करतात. कारल्याला उष्ण व दमट हवामान, तर दोडक्याला समशीतोष्ण व दमट हवामान मानवते. दोडका थोडीशी थंडी सहन करु शकतो; मात्र कारल्याच्या वेलीवर थंडीचा परिणाम होतो.

भुसभुशीत व चांगला निचरा असणाऱ्या भारी ते मध्यम जमिनीत याची लागवड करावी. चोपण अथवा चिबड जमिनीत ही पिके घेऊ नयेत. कारल्याची लागवड उन्हाळी पिकासाठी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करतात. उशिरात उशिरा मार्चमध्येसुध्दा लागवड केली जाते. खरीपाची लागवड जून-जुलै महिन्यात करतात. ‘दोडका’ कमी दिवसात येणारा असल्यामुळे त्याची लागवड कारल्यापेक्षा 15 ते 20 दिवसांनी उशिरा केली तरी चालते. कारल्याच्या ‘कोईमतूर लॉग’ या जातीची फळे पांढरी व लांब असतात. या जातीची लागवड महाराष्ट्रात पावसाळी हंगामात होते.
‘अरका हरित’ या जातीची फळे आकर्षक, लहान, मध्यभागी फुगीर, हिरवीगार असतात. या फळांमध्ये बियांचे प्रमाण अल्प असते. ‘पुसा दो मोसमी’ या जातीचे फळ वजनदार, लांब व हिरवे असते. ही जात दोन्ही हंगामात योग्य आहे. 55 दिवसात फळे काढणीस सुरुवात होते. ‘पुसा विशेष’ ही जात उन्हाळी हंगामासाठी योग्य असून नदीकाठच्या लागवडीस योग्य आहे. याशिवाय विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘सिलेक्शन-4’, ‘सिलेक्शन-5’, ‘सिलेक्शन-6’ ; तसेच ‘कोकण तारा’, ‘फुले ग्रीन गोल्ड’, ‘अर्काहरित’, ‘हिरकणी’ या जाती लागवडीस योग्य आहेत.

दोडक्याच्या ‘पुसा नसदार’ या जातीची फळे एकसारखी लांब व हिरवट रंगाची असतात. या जातीस 60 दिवसांनी फुले येतात. प्रत्येक वेलीस 15 ते 20 फळे लागतात. ‘को-१’ ही हळवी जात असून फळे 60 ते 75 सेमी लांबीची असतात. प्रत्येक वेलीस 4 ते 5 किलो फळे लागतात. याशिवाय ‘पुसा चिकणी’, ‘कोण हरिता’, ‘फुले सुचेता’ तसेच स्थानिक जाती लागवडीस योग्य आहेत.
कारल्यासाठी हेक्टरी 5 ते 6 किलो बियाणे लागते. दोडक्यासाठी हेक्टरी 3 ते 4 किलोग्रॅम बियाणे लागते. झाडाभोवतालचे तण काढून स्वच्छता ठेवावी लागते. जमीन नेहमी भुसभुशीत ठेवावी लागते. दोन्ही पिकास आधाराची गरज असल्यामुळे बांबू अगर झाडांच्या वाळलेल्या फांद्यांचा वापर करावा लागतो. तारांवरसुध्दा वेली पसरवून त्यापासून चांगला नफा मिळविता येतो.
या पिकांवर प्रामुख्याने ‘केवडा’ व ‘भुरी’ रोगाचा प्रादुर्भाव होतो. या पिकांवर प्रामुख्याने ‘तांबडे भुंगेरे’, ‘फळमाशी’ व ‘मावा’ या किडीचा प्रादुर्भाव होतो. लागवडीनंतर 60 ते 65 दिवसांनी फुलोरा येतो. पूर्ण वाढलेली पण कोवळी फळे काढावीत. नखाने हळूच दाबल्यावर व्रण पडतो. ती फळे कोवळी समजावीत. कारल्याचे आणि दोडक्याचे हेक्टरी 100 ते 150 क्विंटल उत्पादन मिळते. कारल्याची फळे कोवळी असतानाच काढावीत.