फळांचा रस प्राशन करताना

खूप जणांना सकाळच्या वेळी उपाशीपोटी फळांचा रस घेण्याची सवय असते. ज्यांना फळ खाणे विशेष आवडत नाही, मात्र फळांचा रस आवडतो, अशी मंडळी सकाळी उठल्या उठल्या हा रस प्राशन करतात. आपण जाहिरातींमध्ये किंवा मालिकांमध्ये जेवणाच्या टेबलवर न्याहारीसाठी असे फळांचे रस ठेवलेले पाहतो. त्यामुळे हा रस म्हणजे पोषक न्याहारीचा प्रकार आहे, असे आपल्याला वाटते; पण फळांचा रस कधी प्यायला हवा, हे देखील माहीत असायला हवे.

योग्य वेळी रस घेतला, तर त्याचा शरीराला नक्कीच फायदा होतो. चुकीच्या वेळी शरीरात रस गेला, तर त्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी संभवतात. प्रत्येक फळामध्ये काही ना काही ‘ॲसिड’सारखे घटक असतात. मुळात सकाळी उठल्यानंतर आपले पोट रिकामे असते. त्यामुळे हे ‘ॲसिड’ शरीरात विरुद्ध क्रिया करु शकते. त्यामुळे अशा वेळी खूप जणांना अपचनाचा त्रास होऊ लागतो.

अवेळी प्राशन केलेले रस हे विपरित परिणाम करणारे ठरतात. खूप जणं फळे आणि गाजर-बीट असा मिश्र रस पितात. आपण उपाशीपोटी असे रस घेतलात तर त्यामुळे काही काळासाठी डोके जड झाल्यासारखे वाटेल. काही जणांना भोवळ आल्यासारखीही होते. त्यामुळे असा रस पिऊन आपण लगेचच प्रवास करु शकत नाही.

फळांचे रस हे पोटाच्या आरोग्यासाठी कितीही चांगले असले, पण त्यांचे सेवन चुकीच्या वेळी झाले; तर त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो. असा रस घेतल्यानंतर खूप जणांच्या पोटात जळजळ होऊ लागते. पोट साफ होत नाही, अशा तक्रारीदेखील दिसून आलेल्या आहेत. ज्यांना पोटाचे विकार अगदी पटकन होतात, अशांसाठीही उपाशीपोटी रस पिणे चांगले नाही. अशा लोकांना अगदी पटकन रस घेतल्यानंतर पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. ओटीपोटात दुखू लागते.

आता जर रस घ्यायचा असेल, तर तो योग्य वेळी घेता आला पाहिजे. फळांचा रस घेण्याची योग्य वेळ ही सकाळी न्याहारीनंतरची आहे. रात्री झोपतानाही रस पिणे चांगले नाही. वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *