
आपल्या दोन मुलांसाठी नॉर्वे सरकारविरुद्ध लढा देणाऱ्या सागरिका भट्टाचार्य यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या सिनेमाची चर्चा सद्ध्या सुरु आहे.दि. १७ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला.
भारतीयांना वेगळी वाटेल अशी ही सत्यकथा आहे. आपला पती (अनिर्बन भट्टाचार्य) आणि दोन मुलांसह नॉर्वेमध्ये राहणारी देबिका चॅटर्जी (राणी मुखर्जी) यांची ही गोष्ट आहे. एक सुखी चौकोनी कुटुंब जगत असलेल्या देबिकाच्या आयुष्यात एक वादळ येते. नॉर्वे सरकारच्या कायद्याप्रमाणे, मुलांची योग्य काळजी घेत नसल्याचा अहवाल तेथील ‘चाइल्ड वेल्फेअर बोर्ड’ कडून दिला जातो. अशा कुटुंबातील मुलांचा ताबा या ‘बोर्डा’ कडे जातो. मुले सज्ञान होईपर्यंत आपल्या आई-वडिलांसोबत राहू शकत नाहीत, अशी चित्रपटाची कथा सांगते. देबिकाच्या घरात ती आपल्या मुलांचे पालनपोषण योग्य पद्धतीने करीत नसल्याची नोंद दहा आठवडे दररोज तिच्याकडे येऊन निरीक्षण करणारे ‘वेल्फेअर बोर्डा’चे प्रतिनिधी नोंदवितात. नंतर देबिकाच्या घरातून तिच्या परवानगीशिवाय तिची दोन्ही अपत्ये ‘बोर्डा’चे लोक घेऊन जातात. जन्मदात्या आईकडून तिची अपत्ये काहीही खोटी कारणे दाखवून आणि कायद्याची ढाल पुढे करून दूर नेण्याच्या या प्रकारानंतर देबिका प्रचंड चिडते. दुसरीकडे तिचा पती मात्र या प्रकारचा नॉर्वे सरकारकडून भविष्यात मिळणाऱ्या नागरिकत्वावर परिणाम तर होणार नाही ना, या भीतीपोटी एका ठराविक मर्यादेतच या सर्व प्रकाराविरोधात लढायचे ठरवतो. देबिका या लढ्यामध्ये सर्वस्व अर्पण करण्याची तयारी दर्शवते. हे प्रकरण उच्च पातळीवर जाते.

या प्रकरणात देबिकाला तिच्या अपत्यांचा ताबा मिळतो का? या लढ्यात तिला कोणाची मदत मिळते? तिला कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट बघायला हवा. विविध देशांमधील कायदे, तेथील कुटुंब व्यवस्था, संगोपनाची व्याख्या, भारतीय कुटुंब व्यवस्था असे अनेक पैलू या घटनेला आहेत. मात्र, इथे ही गोष्ट ‘एक आई विरुद्ध एक देश’ अशा दृष्टिकोनातून मांडली जाते. या चित्रपटाचे निर्माते मोनिशा अडवाणी, निखिल अडवाणी, मधू भोजवानी, लेखन समीर सतिजा, अशिमा चिब्बर, राहुल हंडा यांनी केले असून दिग्दर्शन अशिमा चिब्बर यांनी केले आहे. राणी मुखर्जी, अनिर्बन भट्टाचार्य, नीना गुप्ता या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत.