रेशीम उद्योग
रेशीम उद्योग हा रेशीम धाग्यास असणाऱ्या वाढत्या मागणीमुळे वाढत चाललेला उद्योग आहे. रेशीमच्या कापडाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून अर्थातच रेशीम धाग्यालाही मोठी मागणी आहे.
रेशीम शेतीमुळे खूप लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे मजुरांचे स्थलांतर कमी झाले आहे. ‘तुती’ लागवड करून शेतकऱ्यांनी पर्यावरणाचे रक्षणसुद्धा केले आहे. काही शेतकरी कमी जागेत व कमी पैशात या उद्योगात यशस्वी झाले आहेत व पैसा कमावला आहे.

रेशीम हा एक प्रकारचा पातळ आणि चमकदार धागा असतो. ज्यापासून कपडे विणले जातात, हा धागा ‘कोशामध्ये’ राहणाऱ्या कीटकापासून तयार केला जातो. या व्यवसायाकरिता लागणाऱ्या जमिनीचा विचार केल्यास याला 1 एकर जमीन आवश्यक आहे. साधारण 1700 चौ.फू. शेडमध्ये रेशीम अळ्यांचे संगोपन केले जाते.
हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला ‘तुती’ या रोपाची लागवड करावी लागते, या तुतीच्या पाल्यावर रेशीम किडे जगवावे लागतात. हा पाला त्यांना खावू घालावा लागतो. तुतीची लागवड करण्यासाठी चांगली कसदार जमीन लागते. तुतीच्या रोपांची लागवड करताना दोन रोपांमधील अंतर चार ते पाच फूट ठेवावे लागते, यामुळे तुतीची वाढ चांगल्या प्रकारे होते. तुती हे जंगली झाड असल्यामुळे या झाडाला पाणी कमी प्रमाणात लागते. जेवढे पाणी एक एकर संत्रा बागेला लागते, तेवढ्या पाण्यात तीन एकर तुती आरामात जगते.
या झाडांना पाणी देण्यासाठी आपण ठिबक सिंचन वापरू शकतो. ज्यामुळे पाणी कमीत कमी लागते किंवा पाणी मुबलक प्रमाणात असेल तर आपण पारंपरिक पाटाचे पाणी देऊ शकतो.
तुती ही लागवडीपासून 45 दिवसात कापणीला येते. आपण अडीच ते तीन महिन्यातच उत्पन्न घेऊ शकतो. एकदा तुतीची लागवड केली की लावलेली तुती 10 वर्षापर्यंत आरामात ठेवू शकतो. पुढची 10 वर्षे आपल्याला याद्वारेची पुन्हा लागवड करण्याची गरज भासत नाही.
एका एकराच्या तुतीच्या पाल्यावर आपण 200 ते 300 रेशीम अळ्या जगवू शकतो.याद्वारे 200 किलो रेशीम उत्पादन मिळवू शकतो.
तुतीची लागवड केल्यानंतर ‘रेशीम अंडी पुंज’ आणावे लागतील, ज्यांचे संगोपन करून आपल्याला रेशीम मिळवायचे आहे. हे ‘अंडी पुंज’ जिल्हा रेशीम कार्यालयामधून आणावे लागतील. तिथे रेशीम उद्योग अधिकाऱ्याला भेटून त्यांच्याकडून सर्व माहिती घेवून त्यांना आपल्याला लागणाऱ्या अळ्यांची मागणी करायची आहे, जेणेकरून ते आपल्याला त्या अळ्या पुरवून मार्गदर्शन करतील. जिल्हा रेशीम कार्यालयामधून आपल्याला या अळ्या खूप सोप्या रीतीने मिळून जातात. या उद्योगाकरिता जिल्हा रेशीम कार्यालय आपल्याला प्रशिक्षण सुद्धा देते.
आपल्याला हा उद्योग सुरू करण्याआधी जे लोक हा उद्योग करीत आहेत, त्यांची भेट घेवून त्यांचे मार्गदर्शन घेणे फायदेशीर आहे. आपल्या जिल्ह्यात कोण हा उद्योग यशस्वीरीत्या करीत आहे, ही माहिती आपल्याला जिल्हा रेशीम कार्यालयामधून मिळून जाते.

‘अंडी पुंज’ मिळाले की प्रश्न येतो, अंडी पुंज ठेवायचा ! तर याकरिता आपल्याला एक शेड करावी लागते. 200 ते 300 अंडकोश जर आपण ठेवत असू, तर 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येऊ शकतो. यामध्ये अळ्या ठेवण्याकरिता ‘रॅक’ तयार करावे लागतील, ज्यामध्ये आपण आपल्या अळ्या ठेवू व तिथेच त्यांना खायला देवू. हे ‘रॅक’ आधीच मजबूत करून घ्यायचे; कारण यावर नंतर तुतीच्या पाल्याचे वजन येते. त्यामुळे या दबायला सुरुवात होईल.
शेड बांधण्यासाठी आपल्याला शासन अनुदानही देते. शेडचा आकार हा एका एकरमध्ये 65 फूट लांब आणि 34 फूट रुंद असावा.
अळ्या खूप नाजूक असल्यामुळे यांना रोगाचा प्रादुर्भाव हा लवकर होवू शकतो, म्हणून स्वच्छतेला खूप महत्व आहे.
एका वेळच्या अळ्या निघाल्यानंतर दुसऱ्या त्या शेडमध्ये आणण्यापूर्वी संपूर्ण शेड निर्जंतुक करून घ्यावी.
शेड अशा प्रकारे बांधावी, जेणेकरून त्या शेडमध्ये इतर प्राणी किंवा कीटक येणार नाहीत. कधी या रॅकमध्ये अळ्या मरतात. मेलेल्या अळ्यांना मुंग्या लागायची भीती राहते, ज्यामुळे जिवंत अळ्यांनासुद्धा मुंग्या लागू शकतात. याकरिता उपाय म्हणून आपण ज्या रॅकमध्ये त्या अळ्या ठेवल्या आहेत, त्या रॅकचे पाय हे पाण्यामध्ये ठेवावेत.
स्वतःच्या स्वच्छतेवर सुद्धा लक्ष द्यावे लागते. कारण आपल्या हाताद्वारे रोगांचा प्रादुर्भाव होवू शकतो.
या अळ्यांना तिन्ही हंगामामध्ये खूप काळजीपूर्वक ठेवावे लागते, उन्हाळ्यामध्ये जास्त उन्हामुळे अळ्या मरू शकतात. आपल्याकडे कोणत्या प्रकारची रेशीम अळी ही चांगली राहू शकते, याचा अभ्यास करावा. रेशीम उद्योग हा खूप पैसे देणारा उद्योग आहे. व्यवस्थित व्यवस्थापन करून केल्यास यामधून खूप मोठ्या प्रमाणात आपण रेशीमचे उत्पादन घेवून पैसे कमवू शकतो. हा व्यवसाय शेती आधारित असल्यामुळे तुम्ही याला शेती सोबतच करू शकता. शेती करून या व्यवसायात लक्ष देवू शकता.
यातील बारकावे समजून घ्यायला खूप वर्षाचा अनुभव घ्यावा लागतो. यावर्षी चांगले उत्पन्न मिळाले नाही तर आपल्या रेशीम कार्यालयामधून मार्गदर्शन घेत रहा आणि पुढे चला.
रेशीम उत्पादनात कर्नाटक हे अग्रेसर राज्य आहे. रेशीम उद्योग कर्नाटक मध्ये कूर्ग, म्हैसूर, मंड्या, तुमकुर येथे केले जातात. स्वतंत्र रेशीम संचालनालयाची स्थापना महाराष्ट्रमधील नागपूर येथे करण्यात आली. रेशीम उद्योगामध्ये बंगळुरू हे ‘भारतातील रेशमाची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. आसाममधील रेशीम उद्योगासाठी ‘सोलकूची’ हे प्रमुख केंद्र आहे.