
महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांपैकी चिखलदरा हे एक ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. ‘चिखलदरा’ हे सातपुडा पर्वतरांगांवर वसलेले असून समुद्रसपाटीपासून 3666 मीटर उंचीवर आहे. याठिकाणी निसर्गाचे सुंदर रुप पहायला मिळते. या शिखराला ‘विदर्भाचे नंदनवन’ असे संबोधले जाते. उन्हाळ्यातील सुट्ट्यांमध्ये पर्यटक आवर्जून याठिकाणी येतात. कॉफी हे येथील मुख्य उत्पादन आहे.
हैद्राबाद रेजिमेंटच्या कॅप्टन रॉबिन्स याने इसवी सन 1823 मध्ये चिखलदराला जगासमोर आणले. त्याअगोदर हे ठिकाण लोकांना विशेष माहीत नव्हते. कॅप्टन रॉबिन्स म्हणायचे, की चिखलदराचे नैसर्गिक सौंदर्य त्यांना इंग्लंडची आठवण येऊ देत नाही. हे ठिकाण प्रामुख्याने नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते, त्याचबरोबर या ठिकाणाला पौराणिक पाया देखील आहे. चिखलदराबाबत एक आख्यायिका आहे. ही आख्यायिका महाभारतातील आहे. वनवासामध्ये असताना पांडवांनी याठिकाणी निवास केला होता. कीचकाचा वध भीमाने येथे करून त्याला जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच ‘कीचकदरा’ म्हणजे आताची चिखलदरा होय.
ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकले होते, ती दरी आणि ज्या झर्यात भीमाने आंघोळ केली, ते ‘भीमकुंड’ सुद्धा येथे पहायला मिळते. सातपुडा पर्वतरांगांवर असलेले हे थंड हवेचे ठिकाण आहे. याठिकाणी प्राचीन किल्ले, तलाव आणि हिरवेगार निसर्गसौंदर्य पहायला मिळते. याला ‘विदर्भाचे नंदनवन’ असे देखील म्हणतात.

चिखलदराचे हवामान नेहमी थंड असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते. मेळघाट रांग ही ‘व्याघ्रप्रकल्प’ म्हणून घोषित केली आहे. चिखलदराच्या घाटात आणि चिखलदऱ्याहून ‘सेमाडोह’ला जाणार्या रस्त्यावर वाघ आणि अस्वल दिसतात. त्याचबरोबर मोर, रानकोंबडा, अस्वले पहायला मिळतात. येथील ‘पंचबोल बिंदू’ प्रेक्षणीय आहे; कारण इथे चारही बाजूने डोंगराने वेढलेली खोल दरी आणि धबधबा देखील आहे. या दरीमुळे मोठ्याने आरोळी केली, तर ती प्रतिध्वनीच्या स्वरूपात पाच ते सहा वेळा ऐकू येते.
चिखलदरापासून थोड्याच अंतरावर ‘विराट’ देवीचे मंदिर आहे. त्याचबरोबर नर्सरी उद्यान पहायला मिळते. हे वन विभागाने विकसित केले असून त्यात लहान मुलांसाठी रेल्वेची सोय केली आहे. अजून बरेच पॉईंट येथे पहायला मिळतात. ‘प्रॉस्पेट पॉईंट’, ‘बेलाव्हिस्टा पॉईंट’, ‘बेलेन्टाईन पॉईंट’, ‘मंकी पॉईंट’ तसेच गाविलगड किल्ला हे सर्वच पाहण्यासारखे असून चिखलदरापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. याच्या शेजारी ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्प’ आहे. किल्ल्याच्या भोवताली घनदाट जंगल आहे. ‘गाविलगड’ किल्ला विदर्भाचे भूषण आहे. या किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पहायला मिळतात. त्याचबरोबर एक तलाव आणि 10 तोफा आहेत. घोडे, हत्ती, कोरीव काम यावर उर्दू आणि अरबी भाषेत मजकूर आहे. याठिकाणी एक ‘राणी महाल’ आहे. त्याच्यापासून 45 किलोमीटर अंतरावर ‘विदर्भाचे प्रवेशद्वार’ म्हणजेच छोटा किल्ला आहे.
चिखलदरा हे महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाला जोडल्यामुळे भेट देताना काहीच अडचण येत नाही. याठिकाणी येताना रेल्वे, विमान आणि राष्ट्रीय महामार्गाचा वापर करू शकता. पुण्यापासून चिखलदरा 593 किलोमीटर असून खासगी गाडीने जाण्यासाठी 13 तास लागतात. मुंबईपासून चिखलदराचे अंतर 663 किलोमीटर आहे. हे अंतर कापण्यासाठी चौदा तास लागतात. अमरावती ते चिखलदरा 82 किलोमीटर आहे. येथून चिखलदरा येथे पोहचण्यासाठी फक्त दोन तास लागतात.