मोती निर्मिती उद्योग
शिंपल्यामध्ये तयार होणारे मोती हे एक नैसर्गिक रत्न आहे. स्त्रियांच्या आभूषणातील महत्वाचा आकर्षक घटक आहे. दुर्मिळ असल्याने म्हणा, किंवा सहज उपलब्ध होत नसल्याने त्याचे बाजारमूल्य जास्त आहे. त्यामुळे पाण्यात शिंपले पाळून मोत्यांचे उत्पादन घेण्यासाठी मोती निर्मिती उद्योग सुरु करणे फायदेशीर आहे. मोती हे रत्न दागिने बनविण्यासाठी वापरले जाते. हा मोती शिंपल्यात तयार होतो.
हा उद्योग करणाऱ्या उद्योजकास आठ ते दहा महिने शिंपले पाळावे लागतात. हा शिंपला म्हणजे गोगलगायीचे एक घर आहे. जेव्हा गोगलगाय अन्न खाण्यासाठी घरातून बाहेर पडते, तेव्हा काही सूक्ष्म परजीवी तिला चिकटून शिंपल्याच्या आत प्रवेश करतात. त्यांच्यापासून संरक्षण होण्यासाठी गोगलगाय स्वतःवर एक संरक्षक कवच बनवते. याचेच रुपांतर मोत्यात होते. मुळात, मोत्यांची निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जेव्हा ही प्रक्रिया आपण कृत्रिमरित्या करतो, तेव्हा त्याला ‘मोती निर्मिती उद्योग’ असे म्हणतात. एका मोत्याची किंमत दोनशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत असते. मोती उच्च दर्जाचा असेल तर त्याची किंमत लाखांपर्यंत असू शकते.

मोती निर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी खोली ५ ते ६ फूट खोली असणारा २० x १० आकारमानाचा तलाव आवश्यक असतो. प्रगत तंत्रज्ञानाद्वारे घरच्या घरी टाकी बनवून मोत्याची शेती करता येऊ शकते.
मोती निर्मिती उद्योगासाठी प्रौढ शिंपल्याची गरज असते. हे शिंपले नदी, तलाव, कालवे इत्यादी ठिकाणांहून गोळा केले जाऊ शकतात; अन्यथा आपणास खरेदी करता येतात. या शिंपल्याचा आकार सुमारे 8-10 सेमी. असावा लागतो. उद्योगासाठी जिवंत, प्रौढ शिंपल्याची अत्यंत काळजीपूर्वक निवड करायला हवी.
प्रत्यक्ष प्रक्रिया करताना मोत्याच्या आकारानुसार बी निवडावे लागते. या बिया एका विशिष्ट पद्धतीने शिंपल्यामध्ये घातल्या जाते. 10 दिवस नायलॉन पिशवीत ठेऊन नंतर तपासणी केली जाते. या काळात नैसर्गिक खाद्य देणे फार महत्वाचे असते. मृत पावलेले शिंपले फेकून द्यावे लागतात. शेणखत, केळीची साल हे या शिंपल्यांचे अन्न असते.
उद्योग सुरु करीत असताना निश्चितपणे भांडवलाची आवश्यकता असते. यासाठी तलाव निर्मिती, ‘सर्जिकल हाऊस’ उभारणे जरुरीचे असते. या ‘सर्जिकल हाऊस’ मध्ये काही टेबल आणि खुर्च्यांचीही गरज असते. याशिवाय तलावात वेळोवेळी खत घालावे लागते. तलावातील मृत शिंपले वारंवार बाहेर पडत राहतात. या सगळ्यासाठी भांडवलाची आवश्यकता आस्ते. कुशल कामगार गरजेचे असतात. त्यांना मजुरी द्यावी लागते. हा उद्योग केवळ आर्थिकच नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठीही अनुकूल आणि गरजेचा आहे. यामुळे जलप्रदूषण होत नाही, उलट ते रोखले जाते. शिंपले पाणी स्वच्छ करण्याचे काम करतात.

निधी जमविणे हे या उद्योगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. सरकार लघुउद्योग सुरू करण्यासाठी कर्ज देते. ‘नाबार्ड’ सारख्या ग्रामीण बँकेतूनही कर्ज मिळू शकते. त्यांना आपल्या उद्योगाचे महत्व पटवून द्या.
आपणास हा उद्योग करायचा असल्यास देशात अशी प्रशिक्षण केंद्रे आहेत, तिथे जाऊन मोतीपालन उद्योग शिकून घ्या. जे आधीच मोत्यांचा रोजगार करीत आहेत त्यांनाही भेट देऊन शिकता येईल. स्वत:ची जमीन नसेल, तर जमीन किंवा तलाव भाडेतत्त्वावर घेऊ शकता. त्याचा खर्च वाढेल, पण आंतरिक इच्छा प्रबळ असेल तर आपण त्यात नक्कीच यशस्वी होऊ शकता.
कोणत्याही व्यवसायाच्या साफल्यासाठी प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे. यासाठी जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधून पुरेशी माहिती मिळवा. मानसिक तयारी करा. या उद्योगाबाबत सुमारे 15 दिवस प्रशिक्षण दिले जाते, ते शिकल्यानंतर हे काम सुरू करता येते. त्यासाठी शिकण्याची, मेहनतीची तयारी ठेवा.