शेवगा
शेवग्याच्या शेंगा म्हणजे सर्वांच्या परिचयाचे, सर्वाना आवडणारे एक पीक आहे. बहुतेक वेळेस ते मिरची, वांगी, कांदा, गवार या भाजीपाला पिकांबरोबरच फळबागांमध्येही आंतरपीक म्हणून घेतले जाते. दक्षिणेकडील राज्यांमध्ये तसेच गुजरात राज्यातील ‘वडोदरा’, ‘अहमदाबाद’ तसेच काही इतर भागात शेवगा हे पीक ‘बांधावरील पीक’ म्हणूनही घेतले जाते.

शेवगा पिकासाठी जमीन भुसभुसीत, सेंद्रिय पदार्थांनी युक्त असावी. चिकणमातीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीत शक्यतो लागवड करू नये. महाराष्ट्र राज्यात जवळपास २० वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली असून, ती कमालीची यशस्वी झाली आहे. शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम, भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात शेवग्याला अजिबात पाणी नसले तरी हे झाड तग धरून राहते; मात्र या कालावधीत उत्पन्न खंडित होते.
जेथे वर्षभर पाणी आहे, अशा ठिकाणी ‘नोव्हेंबर ते जून’ असे ७ ते ८ महिने शेवग्याच्या शेंगांचे उत्पन्न मिळते. शेवग्याची लागवड कोकणातील अतिपावसाच्या जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबरपासून करावी. व्यापारी तत्वावर शेवग्याची लागवड करावयाची असल्यास ‘ऑक्टोबर ते फेब्रुवारी’ या कालावधीत करावी. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात लागवड जूनपासून जानेवारीपर्यंत केव्हाही केली तरी चालते. ‘जाफना’, ‘रोहित १’ ,’कोकण रुचिरा’, ‘भाग्या’, ‘पी.के.एम.१’ या शेवग्याच्या काही जाती आहेत. साधारणतः महिन्यातून एकदा पाणी दिले तरी हे पीक उत्पादन देण्यास सक्षम आहे. शेवगा हे तसे कमी पाण्यात येणारे पीक आहे.

शेवगा पिकास अनेकवेळेस वर्षभर फुले येत राहतात; परंतु प्रामुख्याने ‘ऑक्टोबर ते नोव्हेंबर’ आणि ‘एप्रिल ते मे’ या काळात आर्थिक फायदा मिळवून देतील इतकी फुले मिळतात. फुल उमलल्यानंतर परागकण सकाळी ९ ते १० आणि त्याच दिवशी संध्याकाळी ६.३० ते ७ या वेळेत जास्त सक्रिय असतात. शेवग्याच्या स्वतंत्र लागवडीबरोबरच आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, आवळा यासारख्या फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करणे फायदेशीर आहे. वरील फळझाडांचे उत्पन्न मिळेपर्यंत शेवगा उत्पन्न देतो. फळझाडांचे उत्पन्न सुरू झाल्यानंतर शेवग्याची झाडे कमी केली तरी चालू शकते. शेवगा शेतीचे चांगले व्यवस्थापन करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. शेवग्याच्या शेंगांना स्थानिक बाजारपेठांपासून पुणे, मुंबई बाजारात चांगले दर मिळतात.