ताम्रभांडी उद्योग
तांब्याची भांडी बनविण्याचा व्यवसाय आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. अलीकडच्या काही वर्षांपर्यंत अगदी राजेवाड्यांपासून रयतेच्या घरातही तांब्या-पितळेची चकचकीत भांडी दिसायची. हंडा, कळशी, घंगाळ, ताम्रकलश, बंब तसेच इतर सर्व प्रकारची भांडी याच धातूंची असायची. इतिहासात तर ताम्रपाषाण संस्कृतीचा एक कालखंडच आहे. आजही हा व्यवसाय महाराष्ट्रात पुण्यामध्ये केला जातो. दुर्दैवाने, त्याचे प्रमाण आता फार कमी होत चालले आहे. पुण्यातील कारागिरांचा हा भाग ‘तांबट आळी’ म्हणून ओळखला जातो. पूर्वापार चालत आलेल्या वस्तूंची निर्मिती इथे होते. पुण्याच्या ऐतिहासिक जडणघडणीमध्ये ‘तांबट आळी’ चे एक वेगळे स्थान आहे. कासार-तांबट समाज आजही या वस्तीमध्ये तांब्याच्या वस्तू बनवत असून पुण्याचे वैभव जपत आहे.

आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात साठवलेल्या पाण्यात जंतू मारण्याचे गुणधर्म असून पाणी शुद्ध करण्याची क्षमता आहे; म्हणूनच पूर्वी नदीच्या पात्रात तांब्याची नाणी टाकण्याची पद्धत होती. घंगाळी, डेचक्या, तपेली, तांब्या, पूजेची उपकरणे इत्यादी भांडी हे कारागीर उत्तम बनवितात. धातू हाताने ओतून, घडवून, त्याला ठोके देऊन मग त्याची उत्कृष्ट उपकरणे बनवणे हा या तांबट कारागिरांचा व्यवसाय होता, आजही आहे. पुण्यात कसबा पेठेच्या अगदी जवळच पवळे चौकाजवळ यांची वस्ती होती. पूर्वापार यांची घरे बसकी, एकमजली, कौलाचे किंवा पत्र्याचे छत असणारी आणि अरुंद बोळात असत. कामाच्या जागेतच वरच्या मजल्यावर अथवा मागच्या खोल्यांमध्ये यांचे घर असायचे. आजही त्यांनी बनविलेली उत्कृष्ट देशी घाटाची भांडी, आकर्षक पितळेचे जुन्या नक्षीकामाचे दिवे, तांब्या-पितळेची चकचकीत उपकरणे मनावर अक्षरशः मोहिनी घालतात.
अलीकडे जनजागृती होत असल्याने या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. लोक तांब्याची घंगाळी, पितळ्याचे लामण दिवे, तांब्याचे बंब, बाटल्या, भांडी यांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. तरीही ही हस्तकला लयास जाऊ लागली असल्याने भालचंद्र कडू यांच्यासारख्या कसबी कारागिराने किमान एक हजार लोकांना ही कला शिकविण्याचा ध्यास घेतला आहे. स्वतः भालचंद्र कडू यांनी २ महिने अमेरिकेतील ‘येल’ आणि ‘ऍरिझोना’ विद्यापीठात या कलेचे शिक्षण दिले आहे. पंचतारांकित रिसॉर्ट्समध्ये दिसणाऱ्या आकर्षक तांब्याच्या वस्तूंचे निर्माते दाटीवाटीच्या जागेत, आगीच्या धगीत कुठल्याही संरक्षित उपकरणाशिवाय काम करीत असतात. या आकर्षक वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कारागिरांच्या आळीला एकदा भेट द्यायला हवी. उत्कृष्ट अशा हस्तकलेचा लोप होत चालल्याचे दुःख खूपच अस्वस्थ करणारे आहे.

पारंपरिक कौशल्याने प्रथम धातूचा पत्रा गरम करणे, त्यास हवा तसा आकार देणे आणि शेवटी ‘मठारकाम’ करणे, ही या भांडीनिर्मितीची एक प्रक्रिया आहे. पत्र्यावर एकसारखे ठोके देत त्याला प्रमाणबद्ध आणि आकर्षक असे रुप देऊन त्यास आणखी मजबूती देणे याला ‘मठारकाम’ म्हणतात. तांबट आळीतील धातूच्या कामाचे शेकडो वर्षांपूर्वीचे संदर्भ मिळतात. बारा बलुतेदार सामाजिक व्यवस्थेचा भाग असणारी ‘तांबट’ समाजातील कारागीर कोकणातून पुण्यात आल्याचे समजते. पेशवेकाळात इथे पितळ आणि तांबेनिर्मित कौशल्यपूर्ण वस्तूंची भरभराट सुरु झाली. पेशव्यांच्या धार्मिक, आर्थिक आणि लष्करी गरजा भागवणे ही त्यांची भूमिका होती. यात तांब्याची नाणी, स्वयंपाकासाठीची तसेच सजावटीची भांडी, सैन्यासाठी शस्त्रे यांची निर्मिती करून ते भारतभर व्यापारही करीत असत.
शतकानुशतके असलेला धातूंच्या भांड्यांचा वापर, त्यांची उपयुक्तता, टिकाऊपणा आणि आरोग्यकारक साधननिर्मिती करणारे म्हणून तांबट आळीतील कारागिरांनी आपले स्थान टिकवून ठेवले आहे. मात्र तंत्रज्ञानालाही आश्चर्यचकित करणारे हे कसब सध्या कमी कारागिरांच्या हाती उरले आहे. ही कलात्मक परंपरा पुनरुजीवित करण्याची गरज आहे. या व्यवसायावर यांत्रिक युगाचे आक्रमण झाले असून त्याचा प्रतिकूल परिणाम जाणवत आहे.
तांबे तसेच पितळेचे वाढते दर, स्टेनलेस स्टील आणि प्लॅस्टिकचा वाढता वापर यामुळे या व्यवसायाकडे नवीन तरुण पिढीही पाठ फिरवताना दिसते. तांबट कुटूंबातील कारागिरांची संख्या 90% हून जास्त घटली असून आता ‘तांबट आळीत’ मोजकेच कारखाने उरले आहेत. हंडा, कळशी, पात्रे या पूर्वापार चालत आलेल्या वस्तूंबरोबरच ‘गृहसजावटीच्या कलाकृती’ यांचीही निर्मिती सुरु केल्यास आधुनिक तंत्रज्ञानासोबत ऱ्हास होत चाललेला हा व्यवसाय नव्या जोमाने उभारी घेईल. या पारंपरिक कुशल कारागीरांना सर्वांनी पुढे येऊन पाठबळ दिल्यास धातूकामाच्या या कौशल्यांचे भविष्य उज्ज्वल असेल.