पशुखाद्य व्यवसाय
भारत हा कृषिप्रधान देश असून बहुतांश लोकसंख्या अजूनही खेड्यात राहते. शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी आर्थिक कमाईसाठी शेतीसंलग्न कामेही करतात. पशुपालन, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, शेती प्रक्रिया उद्योग हे शेतकऱ्यांचे सह-व्यवसाय आहेत. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडनंतर भारत दुसरा सर्वात मोठा दुधउत्पादक देश आहे. दुधासह लस्सी, श्रीखंड, तूप, मलई अशा प्रक्रिया केलेल्या पदार्थांना बाजारात मोठी मागणी आहे. यामुळेच भारतात पशुखाद्याला मोठी मागणी आहे. भारतात जास्तीत जास्त दूध उत्पादनासाठी गायी, म्हशी, मेंढ्या, शेळ्या पाळल्या जातात. दूध उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना संतुलित आहार दिला जातो. आधुनिकीकरणाच्या या युगात चांगल्या जातीच्या आणि जास्त दूध देणाऱ्या गायी-म्हशींचे पालन तबेला पद्धतीने केले जाते. त्यांची गवताची गरज भागवण्यासाठी त्यांना चारा दिला जातो. त्यामुळे पशुखाद्य व्यवसाय आज प्रगतीच्या मार्गावर आहे.

पशुखाद्याबरोबरच ‘पोल्ट्री फीड’ तयार करणे आणि विकणे हाही एक संयुक्त उपक्रम आहे. ग्रामीण भागात सुधारित अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी पोल्ट्री शेडसोबतच ब्रॉयलर कोंबड्यांसाठी अनेक शेड आहेत. त्यांना लागणारे कोंबडीचे खाद्यही या प्रकल्पात तयार केले जाते. बेरोजगारीवर मात करण्यासाठी गावातील अनेक तरुणांनी गाई-म्हशींचे तबेले, मेंढीचे फार्म, कुक्कुटपालन, ब्रॉयलर फार्म सुरू केले आहेत. त्यांना पशू आणि पक्ष्यांच्या अन्नाची नियमित गरज असते. पशु-पक्ष्यांच्या अन्नाच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी व त्यांच्याकडून चांगल्या दर्जाचे दूध, अंडी आणि मांस उत्पादन मिळविण्यासाठी त्यांना शुद्ध सूत्रानुसार तयार केलेले सकस व समतोल अन्न द्यावे लागेल. बाजारातील मागणीचा अभ्यास करून सुशिक्षित बेरोजगारांनी मध्यम आकाराचे पशुखाद्य निर्मिती प्रकल्प सुरू केल्यास चांगला नफा मिळेल, यात शंका नाही.
ग्रामीण आणि शहरी भागात विशेष पशुखाद्याचे घाऊक विक्रेते आहेत. दूध संघ, दूध डेअरी, कुक्कुटपालनधारक, शेतकरी, गाई-म्हशींच्या तबेल्यांचे मालक पशुखाद्य तयार करून विकू शकतात. चांगली मागणी असलेले अन्न तयार करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील तज्ज्ञाकडून त्याबाबतची माहिती करून घेणे गरजेचे आहे. पौष्टिक पशुखाद्य बनविल्यास उत्पादन उत्कृष्ट होऊन मागणीही वाढेल. पशुखाद्यासाठी मका, तांदूळ, गहू, ज्वारी, तांदळाचा कोंडा, गहू, फिश कट, कडबा कुट्टी, भुसा या कच्चा मालाची आवश्यकता असते. हॅमर मिल, ३ अश्वशक्तीचे इंजिन, ग्राइंडर, मोठा मिक्सर, आदी यंत्रसामग्री या व्यवसायासाठी आवश्यक असते.

जर आपण चारानिर्मिती करून ती विकण्याच्या विचारात असाल तर हंगामनिहाय चारा पिके उदा. मका, बाजरी, ज्वारी, लसूण घास, नेपिअर गवत, सुबाभळ, शेवरी इत्यादी पिकांची लागवड करावी. दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यायी चारा म्हणून ‘मूरघास’ व हायड्रॉपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मिती करावी. चारा निर्मितीसाठी कृषि विद्यापीठे, कृषि संशोधन संस्था यांनी विकसित केलेल्या सुधारित व संकरित चारा पिकांच्या जातींचा लागवडीसाठी उपयोग करावा. शेतकऱ्यांनी पशुखाद्य चारा निर्मिती करण्यासाठी जवळील मूरघास व हायड्रॉपोनिक्स तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याप्रमाणे चारा उपलब्ध करावा. शेतकरी आणि पशुपालकांनी चारा निर्मितीचे योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. वर्षभर चारा कसा उपलब्ध होईल या उद्देशाने चाऱ्याचे एकात्मिक व्यवस्थापन करावे. शेतातील सोयाबीन, ज्वारी, बाजरी इत्यादी पिकाची मळणी केल्यानंतर निघणाऱ्या भुसकटावर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यापासून चांगल्या गुणवत्तेचा चारा उपलब्ध होईल. तयार केलेल्या पशुखाद्य चाऱ्याची गुणवत्ता ही उत्तम असली पाहिजे. त्या चाऱ्यामध्ये जनावरांना मिळणारे अत्यावश्यक पोषक घटक उपलब्ध असले पाहिजेत, म्हणजे आपणास ग्राहक मिळतील.